प्रतिनिधी / कोल्हापूर
राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष स्थापनेपासून आजतागायत पक्ष बांधणीमध्ये कोल्हापूर जिल्हा नेहमी आघाडीवर आहे. बुथ कमिटय़ा स्थापन करून त्या माध्यमातून गावागावात पक्ष रुजवण्याचे काम आजही अविरत सुरु आहे. यामध्ये गेली अनेक वर्षे जिल्हा राष्ट्रवादीचे सरचिटणीस म्हणून काम पाहणारे व सध्याचे जिल्हा कार्याध्यक्ष अनिल साळोखे यांचे अमूल्य योगदान आहे. महापूर काळातील मदत असो, अथवा कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर राबविण्यात येणाऱया प्रतिबंधात्मक उपाययोजना, प्रदेश काँग्रेसकडून राबविण्यात येणाऱया विविध उपक्रमांमध्ये अनिल साळोखे नेहमी अग्रेसर असतात. त्यांच्या या कामाचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कौतूक करून ‘पुढे पुढे करणाऱयांऐवजी’ प्रामाणिकपणे काम करणाऱयांना पक्षामध्ये चांगले स्थान देणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे वरीष्ठ नेते कोल्हापूरात आले की त्यांच्या मागे-पुढे मिरवणारे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची संख्या मोठी आहे. पण पक्षीय संघटना बांधणीमध्ये त्यांचे काम नगण्य आहे. नेत्यांना याची जाणिव असतेच असे नाही. त्यामुळे पक्ष मजबुतीकरणासाठी तळागाळात जाऊन कम करणारे कार्यकर्ते आजही दुर्लक्षित आहेत. पण प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रत्यक्ष काम करणाऱया कार्यकर्त्यांची दखल घेतली असून त्यांचे वैयक्तीकरित्या कौतूक देखील केले आहे. प्रदेशाध्यक्ष पाटील हे आजही कार्यकर्त्याच्या भूमिकेतून काम करत असल्यामुळे त्यांना पक्षवाढीसाठी कोणी किती काम केले याची पूर्णपणे जाणिव आहे. म्हणूनच त्यांनी साळोखेंच्या कामाची दखल घेत त्यांचे कौतूक केले आहे.
साळोखे यांचा पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसाठी मोलाचा वाटा आहे. जिल्हा कार्यकारीणीसह तालुका पातळीवरील सर्व कार्यकारीणींची निवड प्रक्रिया राबविणे, कार्यकर्त्यांना पक्षीय कामासाठी प्रवृत्त करणे, प्रदेश कार्यालयाकडे जिह्यातील पक्षीय कामकाजाचा अहवाल देणे आदी अनेक कामे ते प्राधान्याने करतात. याबाबत पक्षाच्या वरीष्ठ नेत्यांनी त्यांच्या कामाची वेळोवेळी दखल घेऊन कौतूकही केले आहे. ‘बुथ कमिटय़ांच्या माध्यमातून पक्ष मजबुती’ या अभियानाच्या माध्यमातून त्यांनी ‘प्रदेश’च्या मार्गदर्शनाखाली बुथ कमिटय़ांची स्थापना केली. त्यांच्या या कामाची प्रदेश राष्ट्रवादीकडून दखल घेतली आहे. जिल्हा नेतृत्वाने त्यांच्या कामाचे कौतूक केले नसले तरी प्रदेश पातळीवर मात्र त्यांच्या कामाचा गौरव करण्यात आला आहे. त्यांच्यावरील विश्वासामुळेच 2019 च्या महापूरकाळात राज्यभरातून पूरग्रस्तांसाठी आलेली मदत पारदर्शीपणे वाटण्याची जबाबदारी देखील पक्षाने साळोखे यांच्यावर सोपवली होती.