प्रतिनिधी / पणजी
राजधानी पणजीतील सर्व रस्त्यावरील सर्व खड्डे बुजवून ते रस्ते दुरूस्त करण्यासाठी एनएसयुआयच्या गोवा शाखेने 15 दिवसांची मुदत दिली असून त्या कालावधीत खड्डे न बुजवल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. पाटो प्लाझा-पणजी येथे खड्य़ात झाडे लावून ‘गांधीगिरी’ पद्धतीने एनएसयुआय कार्यकर्त्यांनी सरकारचा निषेध केला. तसेच सरकार विरोधी घोषणाही दिल्या.
एनएसयुआयचे गोवा अध्यक्ष नौशाद चौधरी यांनी सांगितले की सार्वजनिक बांधकाम मंत्री दिपक पाऊसकर यांनी रस्ते दुरूस्त करण्याची, खड्डे बुजवण्याची तसेच रस्त्यांसाठी 10 वर्षाची हमी अनेकदा दिली होती व तशा घोषणाही केल्या होत्या. परंतु त्यापैकी सध्या कहीच झालेले नाही. राजधानी पणजीतील अनेक रस्ते खराब झाले असून मोठमोठे खड्डे पडले आहेत ते कोणच दुरूस्त करीत नाहीत म्हणून हा निषेध केल्याची माहिती त्यांनी दिली.
पणजीचा स्मार्ट सिटीसाठी वारंवार उल्लेख होतो परंतु प्रत्यक्षात काहीच स्मार्ट नाही. एकही रस्ता स्मार्ट नाही. खड्डय़ाशिवाय एकही रस्ता नाही अनेक रस्ते पाण्याखाली जातात व पावसाचे पाणी तुंबते. त्यावर उपाययोजना सरकार करीत नाही अशी टीका त्यांनी केली.
रस्त्याच्या कामात 30 टक्के कमिशन लपलेले आहे म्हणून तर रस्ते लवकर खराब होतात. आणि त्याकडे सरकार दुर्लक्ष करते. या खड्डय़ामुळे वाहनांची-माणसांची विनाकारण हानी होत असून अपघाताने अनेकजण बळी व अपंग पडलेले आहेत. वाहनचालकांची सुरक्षाच धोक्यात आली आहे. वाहन चालकांकडून दंड वसूल केला जातो. पण रस्त्याकडे लक्ष कोण देत नाही. बांधकाम खात्याने 15 दिवसात रस्ते दुरूस्त करावेत नाहीतर पुन्हा रस्त्यावर उतरण्याचा इशारा नौशाक चौधरी यंनी दिला आहे.