प्रतिनिधी / करमाळा
पत्रकारांनी पत्रकारिता करत असताना वास्तव परिस्थितीचे भान ठेवून लिखाण करणे गरजेचे आहे. केवळ टीआरपी वाढवण्यासाठी दिलेल्या बातम्यांमुळे समाज स्वास्थ्य बिघडू शकते याचे भान पत्रकारांनी ठेवणे गरजेचे आहे. असे स्पष्ट मत खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी व्यक्त केले.करमाळा तालुका पत्रकार संघाच्या उद्घाटन समारंभानंतर झालेल्या सभेत ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर जि.प.अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, दत्त कला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ,जि.प.सदस्य सवितादेवी राजेभोसले, चंद्रकांत सरडे , पंचायत समिती सभापती गहिनीनाथ ननवरे, बापू झोळ, संतोष वारे, अॅङ सविता शिंदे, नलिनीताई जाधव,अजित तळेकर, प्रा. शिवाजी बंडगर, रामभाऊ ढाणे, गणेश चिवटे रमेश कांबळे, लक्ष्मण भोसले आदीसह पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना संभाजीराजे म्हणाले की तुळजापूरमध्ये मराठा समाजाचा संयम सुटलेला असताना मला त्या ठिकाणी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी भाषण करावे लागले. यावेळी बोलताना मी म्हणालो की वेळ आल्यानंतर मी तलवार काढेन, माझ्या बोलण्याचा अर्थ असा होता की उपस्थित समाज ज्या पद्धतीने घोषणाबाजी करून आपला राग व्यक्त करत होता. तो राग शांत करण्यासाठी एक समाजाचा प्रतिनिधी म्हणून परस्थिती हाताळण्यासाठी हे मी वक्तव्य केले. पण त्या ठिकाणच्या पत्रकारांनी मी संपूर्ण भाषणात काय बोललो हे न लिहिता आता संभाजी राजे कोणावर तलवार चालवणार असा प्रश्न उपस्थित स्थित करून दुसऱ्या दिवशी भडक बातम्या दिल्या. आमच्या विरोधी पक्षाने तर आता संभाजी राजे ओबीसींवर तलवार चालवणार का असा प्रश्न उपस्थितीत केला.
हा सर्व प्रकार ऐकल्यानंतर बघितल्यानंतर अक्षरशः माझ्या डोळ्यात पाणी आले कारण मी शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचाराने काम करणारा छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्यातील वंशज असून मी बाराबलुतेदार, अठरा पगड जातींना पुढे घेऊन जाणारा माणूस आहे. आणि मला त्याच पद्धतीने राजकारण समाजकारण करायचे आहे. मात्र माझ्या वाक्याचा विपर्यास करून जो टीआरपी वाढला त्याचा त्यांना आनंद झाला असेल पण मला त्याचे किती दुःख झाले. हे मी शब्दात सांगू शकत नाही. यामुळे माजी पत्रकारांना एकच विनंती आहे. की शक्यतो समाजाच्या हिताचेच लिखाण झाले पाहिजे. करमाळा तालुका पत्रकार संघाच्याबाबतीत अध्यक्ष महेश चिवटे यांनी केलेल्या उल्लेखाप्रमाणे संपूर्ण परिस्थिती मला अवगत असून भावी काळातसुद्धा करमाळा तालुका पत्रकार संघाच्या काही अडचणी असल्यास मी तुमच्या पाठीमागे ठामपणे उभा राहणार आहे.
यावेळी पत्रकार संघाच्यावतीने हार फेटा शाल श्रीफळ व छत्रपती शिवाजी महाराजांची की भव्य प्रतिकृती महाराजांना देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.