प्रतिनिधी / लांजा
तालुक्यातील पन्हळे येथील 20 वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या लघु धरणाला सोमवारी रात्री उशिरा गळती सुरू झाल्याने नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली होती. पाटबंधारे कार्यकारी अधिकारी अभियंता यानी भेट देऊन पाहणी केली असता या धरणाला कोणताही धोका नसल्याचा दावा केला आहे. त्या दृष्टीने खबरदारीही घेण्यात आली आहे.
पन्हळे येथील धरणाच्या मध्यभागी खालील भागातून गढूळ पाण्याची गळती सुरु झाली होती. खबरदारी म्हणून धरणातील पाणी दाबसाठा विसर्ग करण्यात आला आहे. सोमवारी रात्री सोमवारी या धरणातून गढूळ पाणी येऊ लागल्याचे जोशी, गुरववाडीतील ग्रामस्थांना दिसून आले. त्यानंतर सरपंच मसणे यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱयांना याची माहिती दिली. त्यानंतर कार्यकारी अभियंता जगदीश पाटील, शाखा अभियंता संजय नलावडे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पाटबंधारे विभागाच्या तंत्रज्ञांनी या ठिकाणी पाहणी केली. या धरणातून गढूळ पाणी प्रवाह सुरू होता.
या धरणात 3.44 द.घ.ल. मीटर पाणीसाठा पावसाने झाला आहे. तालुक्यात अवकाळी आणि मुसळधार पावसाने सर्वच धरणातील पाणीसाठा वाढला आहे. पाणी दाबामुळे धरणाला कोणत्याही प्रकारचा धोका होऊ नये, यासाठी पाणीसाठय़ाचा विसर्ग करण्यात आला. सकाळी या ठिकाणी लांजा तहसीलदार पोपट ओमसे, लांजा पोलीस निरीक्षक संजय चौधर यांनी भेट दिली.
चौकट …
कोणताही धोका नाही या धरणाला गेली 5 वर्ष अल्प प्रमाणात गळती आहे. मात्र या संदर्भात सातत्याने दुरुस्ती होत असते. सोमवारी सुरू झालेली गळती धोक्याची नसून दुरुस्तीचाच हा एक भाग आहे. या धरणातील जादा पाणी दाब कमी करण्यात आला असून मध्यरात्री ही गळती थांबली होती. गळती सुरू झाल्याने ग्रामस्थ भयभीत झाले होते. मात्र आता कोणताही धोका नाही. धरणाच्या डागडुजीसाठी 1 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक मंजूर करण्यात आले आहे.