बेंगळूरहून राजस्थानला ट्रकमधून निघालेल्या 353 कामगारांना कर्नाटक–महाराष्ट्र हद्दीवर अडविले
प्रतिनिधी/ बेळगाव
लॉकडाऊनमुळे कामधंदा बंद… पगार नाही, घरमालकानेदेखील घरातून हाकलून लावले… अशा स्थितीत उपासमारीची वेळ आली आहे. कोरोना झाला की लोक मरतात इतकंच आम्हाला माहीत आहे. आता आम्हाला कोणत्याही परिस्थितीत आमच्या घरी पोहोचायचं आहे…. अशा विचाराने बेंगळूरहून राजस्थानला ट्रकमधून निघालेल्या 353 कामगारांना कर्नाटक-महाराष्ट्र हद्दीवर अडविण्यात आले. वैद्यकीय तपासणी करून विविध ठिकाणी त्यांना बंदिस्त ठेवण्यात आले आहे.
महामारी आणि महागाई अशा दोन्ही विवंचनेत सापडलेल्या रोजंदारीवर काम करणाऱया कामगारांना घरमालकाने घरामधून बाहेर काढले. अशा स्थितीत जायचे कोठे? असा प्रश्न परप्रांतीय कामगारांना भेडसावू लागला आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत आपले घर गाठायचे, इतकेच उद्दिष्ट ठेवून पायी चालत किंवा मिळेल त्या वाहनाने जाण्याचा प्रयत्न परप्रांतीय कामगार करीत आहेत. दिल्लीप्रमाणे अन्य बडय़ा शहरांमध्ये ही परिस्थिती निर्माण झाली असून महाराष्ट्र-कर्नाटक हद्दीवर तपासणी नाक्मयावर निपाणीजवळ 353 रोजंदारी कामगारांना अडविण्यात आले. ट्रकमधून बेंगळूरहून ते राजस्थानला निघाले असल्याची माहिती उजेडात आली. यामध्ये आठ महिन्याच्या बालकासह महिलांचाही समावेश आहे.
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. यामुळे रोजंदारीवर काम करणाऱया कामगारांवर उपासमारीची वेळ आली असून कामधंदा नसल्याने पगार मिळत नाही. रेशनसह जीवनावश्यक साहित्याचे दर दुप्पट झाले असल्याने जगायचे कसे? असा प्रश्न परप्रांतीय कामगारांना भेडसावत आहे. काही कामगारांना घरमालकाने घरे रिकामी करण्याचा तगादा लागला आहे. काम नाही तर पगार नाही, अशी भूमिका कंत्राटदारांनी घेतली आहे. यामुळे बेंगळूरसह विविध परिसरात इमारत बांधकाम, पेंटिंग, कारपेंटर, फरशी फिटिंग आणि विविध कामे करणाऱया रोजंदारी कामगारांनी आपले घर गाठण्याचा प्रयत्न केला आहे. बेंगळूर ते राजस्थान हा 2200 किलोमीटरचा प्रवास पायी चालत जाण्याचा निर्धार करून परप्रांतीय कामगार घराबाहेर पडले. राष्ट्रीय महामार्गावर काही ट्रकचालकांना अडवून राजस्थानला सोडण्याची विनंती केली. त्यामुळे एकूण सहा ट्रकमधून 341 जण राजस्थानला जाण्यासाठी शनिवारी रात्री निघाले. पण रविवारी सायंकाळी महाराष्ट्र-कर्नाटक हद्दीवर या सहा ट्रकची अडवणूक करून चौकशी केली असता ते कामगार असल्याची माहिती उजेडात आली.
याबाबतची माहिती पोलीस प्रशासनाने जिल्हाधिकाऱयांना कळविली. सदर माहिती समाज कल्याण खाते आणि महापालिका आयुक्त जगदीश के. एच. यांना देऊन ट्रकमधील सर्व कामगारांना ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणी करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱयांनी बजावला. त्यामुळे 341 जणांसह चालक आणि क्लिनर अशा एकूण 353 पैकी 117 जणांना बेळगाव येथील समाज कल्याण खात्याच्या वसतिगृहात बंदिस्त ठेवण्यात आले आहे. वंटमुरी येथे 139 आणि उर्वरित कामगारांना हुक्केरी येथे राहण्याची व्यवस्था करण्यात आली. सर्व कामगारांची प्राथमिक वैद्यकीय तपासणी करून जेवणाची व्यवस्था केल्याची माहिती महापालिका आयुक्त जगदीश के. एच. यांनी दिली.