यात्रा-जत्रा, शैक्षणिक सहली बंद : विशेष बससेवा ठप्प : अधिक उत्पन्नापासून वंचित
प्रतिनिधी /बेळगाव
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जत्रा-यात्रा, लग्न समारंभ, शालेय सहली, पर्यटनस्थळांवर मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे धावणाऱया जादा बसेसदेखील थांबल्या आहेत. डिसेंबर, जानेवारी हा काळ परिवहन मंडळाचा व्यावसायिक हंगाम म्हणून ओळखला जातो. मात्र कोरोनामुळे कार्यक्रमांवर बंदी आल्याने सलग दुसऱया वषीदेखील परिवहनला जानेवारी सीझनपासून दूर रहावे लागले आहे.
परिवहनला दैनंदिन वाहतुकीबरोबर लग्न, शालेय सहली, यात्रा-जत्रा यामधून अधिक उत्पन्न मिळत असते. मात्र कोरोनामुळे या साऱयावर बंदी आल्याने अधिक उत्पन्नापासून वंचित रहावे लागले आहे. लग्न, शालेय सहलींसाठी जानेवारी महिन्यात अधिक बस विविध ठिकाणी धावत असतात. मात्र गतवर्षापासून शालेय सहली थांबल्या आहेत. त्यामुळे परिवहनला शालेय सहलींच्या माध्यमातून मिळणाऱया उत्पन्नापासून दूर रहावे लागले. डिसेंबर-जानेवारीदरम्यान विविध पर्यटनस्थळांना भेटी देणाऱया प्रवाशांची संख्या अधिक असते. मात्र पर्यटनस्थळे बंद ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे पर्यटनस्थळांकडे धावणाऱया बसदेखील थांबून आहेत.
सौंदत्ती यल्लम्मा यात्रेचा फटका
सौंदत्ती येथील यल्लम्मा यात्रेसाठी दरवषी आठ ते दहा जादा बस धावत होत्या. मात्र मागील वर्षापासून यात्रा रद्द झाल्याने परिवहनला यल्लम्मा यात्रेतून मिळणाऱया उत्पन्नापासून दूर रहावे लागले आहे. यात्राकाळात मध्यवर्ती बसस्थानकातून सौंदत्ती यात्रेला जाणाऱया बसची संख्या अधिक होती. या यात्रेतून 25 लाखांचा महसूल मिळत होता. मात्र यंदाही यात्रा रद्द झाल्याने महसुलावर पाणी सोडावे लागले आहे.
मंदिरे, पर्यटनस्थळे बंद
डिसेंबर-जानेवारी दरम्यान बेंगळूर, म्हैसूर, विजापूर, श्रवणबेळगोळ यासह महाबळेश्वर, गडकिल्ले आणि गोव्याला जाणाऱया प्रवाशांची संख्या अधिक असते. मात्र कोरोनामुळे मंदिरे आणि पर्यटनस्थळे बंद झाल्याने भेटी देणाऱया प्रवाशांची संख्या रोडावली आहे. तसेच सौंदत्ती यल्लम्मा, जोतिबा, पंढरपूर, मायाक्का चिंचली आदी मंदिरे बंद ठेवण्यात आल्याने भाविक प्रवाशांची संख्या थांबली आहे. त्यामुळे परिवहनला फटका बसला आहे.
शालेय सहली थांबल्या
दरवषी डिसेंबर-जानेवारी दरम्यान शालेय सहलींचे आयोजन केले जाते. शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थी विविध पर्यटनस्थळे आणि ऐतिहासिक स्थळांना भेटी देतात. दरम्यान शालेय सहलींसाठी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून परिवहनच्या बसना पसंती दिली जाते. मात्र गतवर्षापासून शालेय सहली थांबल्याने या माध्यमातून मिळणारा महसूल थांबला आहे.
जादा धावणाऱया बसदेखील थांबल्या
दरवषी यात्रा-जत्रा, शालेय सहली, लग्न समारंभ व इतर कार्यक्रमांतून लाखो रुपयांचे उत्पन्न मिळते. डिसेंबर महिना हा परिवहनला उत्पन्नाच्या दृष्टिकोनातून व्यावसायिक हंगाम ओळखला जातो. मात्र शालेय सहलींबरोबर मंदिरे आणि इतर कार्यक्रम थांबल्याने जादा धावणाऱया बसदेखील थांबल्या आहेत. त्यामुळे अधिक उत्पन्नापासून वंचित रहावे लागले आहे.
-पी. वाय. नाईक (विभागीय नियंत्रण अधिकारी केएसआरटीसी)
परिवहन आर्थिकदृष्टय़ा अडचणीत : प्रवाशांचा अल्पप्रतिसाद, राज्य सरकारची मदत
शनिवार-रविवारी रोडावलेल्या प्रवासी संख्येत सोमवारी काही प्रमाणात वाढ झाली होती. त्यामुळे स्थानिक प्रवाशांसह लांबपल्ल्याचा प्रवास करणाऱया प्रवाशांची संख्या वाढली होती. विकेंड कर्फ्यू मागे घेतला असला तरी शनिवारी आणि रविवारी प्रवाशांची संख्या अगदी नगण्य होती. त्यामुळे परिवहनला फटका बसला
आहे.
मध्यवर्ती बसस्थानकातून उचगाव, वडगाव, अनगोळ, काकती, होनगा, बस्तवाड, हंदिगनूर, मण्णिकेरी, कट्टणभावी, गोजगा, कंग्राळी बुद्रुक, कुदेमनी, सावगाव, येळ्ळूर, अतिवाड यासह खानापूर, निपाणी, गोकाक, अथणी, हुक्केरी, बैलहोंगल, हुबळी, धारवाड, रामदुर्ग, म्हैसूर, बेंगळूर आदी बससेवादेखील सुरळीत सुरू झाली आहे. विकेंड कर्फ्यूकाळात बाजारपेठ, बँक व इतर व्यवहार बंद राहिल्याने प्रवाशांची संख्या घटली होती.
मागील दोन वर्षांत परिवहनला प्रचंड प्रमाणात फटका बसला आहे. त्यामुळे परिवहन आर्थिकदृष्टय़ा अडचणीत सापडले असून तिजोरीत ठणठणाट निर्माण झाला आहे. शिवाय कर्मचाऱयांना नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे वेतन अद्याप मिळाले नाही. अशा परिस्थितीत परिवहनच्या मदतीसाठी राज्य सरकार धावून आले आहे. राज्य सरकारने परिवहनला तब्बल 103 कोटींचे अनुदान दिले आहे. यातून कर्मचाऱयांचे वेतन दिले जाणार आहे. त्यामुळे कर्मचाऱयांना दिलासा मिळाला आहे.