प्रतिनिधी/ बेळगाव
राज्य परिवहन मंडळाची बससेवा मागील 18 ते 20 दिवसांपासून पूर्णपणे बंद आहे. त्यामुळे परिवहन मंडळाच्या बेळगाव विभागाला दररोज 80 लाखांचा फटका बसत आहे. बेळगाव व चिकोडी विभागाला मिळून तब्बल दीड कोटीचा फटका सहन करावा लागत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दि. 20 मार्च रोजी आंतरराज्य बससेवा बंद करण्यात आली होती. त्यानंतर देशात लॉकडाऊन सुरू झाल्यापासून परिवहन मंडळाच्या स्थानिक बसेससह लांब पल्ल्याच्या सर्व बसेस बंद झाल्याने परिवहन मंडळाला मोठा तोटा सहन करावा लागत आहे.
बेळगाव आगारातून दररोज स्थानिक बसेससह निपाणी, कोल्हापूर, संकेश्वर, इचलकरंजी, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे, कराड, मुंबई, धारवाड, हुबळी, मंगळूर, बेंगळूर, गोवा, चिपळूण, विजापूर, हैद्राबाद आदी ठिकाणी लांब पल्ल्याच्या बसेस धावत असतात. बेळगाव विभागात एकूण सात आगार असून बेळगाव विभागातील चार आगारांसह रामदुर्ग, बैलहोंगल, खानापूर या आगारांतून दररोज धावणाऱया हजारो बसेस थांबून आहेत. बेळगाव विभागातून दररोज दीड हजार गाडय़ा धावतात तर त्यांच्या 2711 फेऱया होत असतात. त्यामुळे बेळगाव आगारातून परिवहनला मोठा महसूल मिळत असतो. मात्र लॉकडाऊनमुळे गेल्या 18 ते 20 दिवसांपासून बससेवा पूर्णपणे बंद झाल्याने परिवहनच्या महसुलावर पाणी फेरले आहे. दि. 22 मार्च रोजी जनता कर्फ्युमुळे बस बंद होत्या. त्यानंतर देशात लॉकडाऊनचा आदेश दिल्यापासून संपूर्ण बससेवा बंद ठेवण्यात आली आहे.
बेळगाव मध्यवर्ती बसस्थानकातून शेजारील महाराष्ट्र व गोवा राज्यांत धावणाऱया बसेसची संख्या अधिक आहे. याबरोबरच आगारातून तिरुपती, म्हैसूर, गोवा, विजापूर, बेंगळूर आदी पर्यटनस्थळांकडे धावणाऱया बसेसही अधिक प्रमाणात आहेत. त्यामुळे बसबंदचा फटका बेळगाव विभागाला मोठय़ा प्रमाणात बसला असून साधारण 6350 इतके बसचालक, बसवाहक व तांत्रिक कर्मचारी आपापल्या गावी गेले आहेत. इतिहासात प्रथमच इतके दिवस बससेवा बंद असल्यामुळे बसस्थानक तब्बल 18 ते 20 दिवसांपासून सुनेसुने झाले आहे.