संजय हरमलकर यांचे प्रतिपादन, ‘आमचो भाई’ या कार्यक्रमाला उत्स्फुर्त प्रतिसाद
प्रतिनिधी/ पणजी
गेली कित्येक वर्षे काँग्रेस सरकारच्या कारकिर्दित पणजीतील इस्टिटय़ूट ऑफ मिनेझिस ब्रागांझा (आयएमबी) या वास्तुची पूर्णपणे र्दुदशा झाली होती. आपली नेमणूक अध्यक्ष पदावर केली. परंतु ही जबाबदारी मी घेण्यास तयार नव्हतो. शेवटी मनोहर पर्रीकर यांनी स्वतः येथे येऊन पाहणी करुन आयएमबीचे नुतनीकरण केले. आज जे सुशोभित आयएमबीची वास्तु आहे, ही केवळ भाईमुळेच. असे प्रतिपादन आयएमबीचे अध्यक्ष संजय हरमलकर यांनी केले.
रविवारी पणजीतील इस्टिटय़ूट ऑफ मिनेझिस ब्रागांझा येथे पर्रीकर मित्र परीवार यांच्याकडून मनोहर पर्रीकर यांच्या जयंतीदिनानिमित्त आयोजित ‘आमचो भाई’ या कार्यक्रमादरम्यान संजय हरमलकर बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत आमदार व माजी मंत्री एलिना साल्ढाना, भाईचे सुपुत्र उत्पल पर्रीकर, निना नाईक, पत्रकार वामन प्रभु, व सदगुरु पाटील उपस्थित होते.
सुरुवातीच्या काळात मी शिवसेनेसाठी काम करायचो व भाई तेव्हा संघ व भाजपसाठी कार्य करायचे पण भाई व माझे घनिष्ट संबध होते. अनेक वाईट वेळेत ते माझ्यासोबत होते. आम्ही देखील अनेकदा जेव्हा राष्ट्रीय नेत्याची सभा असायच्या तेव्हा त्यांच्या सभेला कार्यकर्ते पाठवायचो. याचे मुख्य कारण म्हणजे भाईचा स्वभाव. भाईने कधीही कुणाला तोडले नाही, त्यांनी नाती नेहमी जोडून ठेवली. हा उत्तम गुण भाईमध्ये होता. सामान्य लोकांना कसे घेऊन चालावे हे भाईकडून शिकावे. असेही हरमलकर यांनी यावेळी पुढे सांगितले.
माझे बाबा ज्यांना संपूर्ण गोवा ‘भाई’ म्हणून ओळखतो त्यांच्यासोबत माझी अनेक आठवणी आहेत. गोवेकरांना त्यांच्यासोबतच्या अनेक सामाजिक व राजकीय आठवणी आहेत परंतु मला त्यांच्या वैयक्तिक व माझ्या लहानपणाच्या आठवणी आहे. अनेक आठवणी अशा आहे ज्यातुन मला बाबा माझे मित्र झाल्याचे अनुभव आले आहे. त्यांचे काम नेमहीच येणाऱया पिढीच्या लक्षात राहील असे नाही पण बाबासारखे सामान्य व्यक्ती देशाचे सरंक्षणमंत्री होऊ शकतात ही प्रेरणा मात्र पुढच्या पिढीपर्यंत असणे गरजेचे आहे. असे उत्पल पर्रीकर यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान येथे उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाईसोबतच्या आठवणींना उजाळा दिला.