ममता बॅनर्जींवरील नाराजीपोटी भाजपकडे कल असल्याचा तज्ञांचे मते
पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या परिणामांची उत्सुकता आतापासूनच दिसून येत आहे. वास्तविक अद्याप 159 मतदारसंघांमध्ये निवडणूक व्हावयाची आहे. चार टप्प्यांमध्ये हे मतदान होणार आहे. या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि तृणमूल काँगेस यांच्यात लढत असल्याचे चित्र आहे. डावे पक्ष आणि काँगेसची युती कोणत्याही राजकीय विश्लेषकाच्या खिसगणतीतही नाही.
तथापि, या राज्यात डाव्या पक्षांचा एक विशिष्ट मतदार आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत हा मतदार मोठय़ा प्रमाणात भाजपकडे सरकल्याने भाजपच्या 18 जागा निवडून आल्या होत्या. यामुळेच भाजपने विधानसभा निवडणुकीत जोरदार प्रचाराची रणधुमाळी उडवून दिली आहे. याही निवडणुकीत याच कारणासाठी, स्पर्धेत नसलेल्या डाव्यांची मते निर्णायक ठरतील असे भाकित अनेक अभ्यासकांनी पेले आहे. ही मते ज्या पक्षाकडे झुकतील त्याचे वर्चस्व राहील.
2019 च्या लोकसभा निवडणुकीत डाव्या पक्षांनी काँगेसशी युती केली खरी, पण त्यांची एकही जागा निवडून आली नाही, तर काँगेसला दोन जागांवर समाधान मानावे लागले. या दोन्ही पक्षांना मिळून 16 टक्के मते मिळाली.
2016 निवडणुकीची स्थिती
2016 च्या विधानसभा निवडणुकीची आकडेवारी पाहता तृणमूल काँगेसला 50 टक्के मतांसह 211 जागा मिळून प्रचंड यश मिळाले होते. डावे व काँगेस युतीला 34 टक्के मतांसह 74 जागा मिळाल्या होत्या. तर भाजपला अवघी 10 टक्के मते आणि केवळ 3 जागा मिळाल्या होत्या. तथापि, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत डावे व काँगेसची मते मोठय़ा प्रमाणात कमी झाली. ममता बॅनर्जींनाही काही प्रमाणात फटका बसला. तर भाजपच्या मतांमध्ये 30 टक्क्यांनी वाढ झाली.
यावेळी काय होणार ?
यावेळीही डाव्या मतदारांचा कल अधिक प्रमाणात भाजपकडे झुकत आहे, असे प्रत्येक लोकांमध्ये मिसळणाऱया अनेक पत्रकारांचे मत आहे. तृणमूल काँगेस सत्तेवर आल्यानंतर या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी डाव्या पक्षांच्या कार्यकर्त्यांना प्रचंड त्रास दिला. डाव्या पक्षांना संपवायचेच या निर्धाराने त्यांनी मुस्लीम तुष्टीकरणाचे धोरण अवलंबिले. मुस्लीम मते डाव्या पक्षांकडे पुन्हा वळू नयेत, हे ध्येय ठेवून त्यांनी गेली 10 वर्षे राज्य केले असा आरोप अनेक अभ्यासक करतात. पण हे करताना हिंदू मतदारांचे ध्रूवीकरण अपोआप होत आहे, याचे भान त्यांना राहिले नाही, असाही आरोप केला जातो. याच हिंदू ध्रूवीकरणाचा फटका त्यांना लोकसभा निवडणुकीत बसला आणि त्यांच्या लोकसभेतल्या 34 जागांची संख्या 22 वर आली, असेही विश्लेषण अनेक तज्ञांनी केले आहे. या विधानसभा निवडणुकीतही त्याचमुळे मतांच्या धार्मिक ध्रूवीकरणाचा मुद्दा प्रकर्षाने चर्चिला जात आहे.
आज राम, कल वाम
सध्या राज्यात जय श्रीराम ही घोषणा लोकप्रिय आहे. डाव्या पक्षांचे कार्यकर्तेही आज रामाचा झेंडा हाती घेताना दिसत आहेत. भाजपसंबंधी त्यांना कितपत आत्मीयता आहे, हा मुद्दा वेगळा असला तरी तृणमूलचे सरकार त्यांना नको आहे. त्यामुळे डाव्या पक्षांचे केंद्रीय नेते भाजपच्या विरोधात असले तरी तळागाळातील कार्यकर्त्यांची भूमिका वेगळी आहे. तृणमूलचे सरकार गेल्यास डाव्यांना राज्यात पुन्हा बळकटी आणता येईल. तेवढी उसंत मिळेल, अशी त्यांना अपेक्षा आहे. त्यामुळे या राज्यात ‘आज राम, कल वाम’ ही घोषणा त्यांच्याकडून दिली जाते.
डाव्यांच्या मतांचे महत्व
2019 च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि तृणमूल यांच्या मतांमधील अंतर अवघ्या तीन टक्क्यांचे होते. त्यामुळे डावे व काँगेस युतीकडे असलेली 16 टक्के मते अधिक प्रमाणात भाजपकडे झुकली तर ही विधानसभा निवडणूक चांगलीच चुरशीची होईल. मात्र ही मते अधिक प्रमाणात तृणमूलकडे गेल्यास त्या पक्षाचा मोठा विजय होऊ शकेल. त्यामुळे डावे पक्ष या निवडणुकीत फारसे महत्वाचे ठरणार नसले तरी त्यांच्या मतांसाठी रस्सीखेच सुरूच आहे.
पुढचे चार टप्पे महत्वाचे…
ड आजच्यासह पुढील तीन टप्प्यांमध्ये 159 जागांवर मतदान
ड आजच्या चौथ्या टप्प्यासाठी सुरक्षा व्यवस्था अधिक बळकट
ड आज उत्तर आणि मध्य बंगाल मध्ये 45 जागांवर मतदान
ड कोरोनामुळे यापुढे जाहीर प्रचार केवळ 10 ते 7 पर्यंतच