नवी दिल्ली/प्रतिनिधी
क्रिकेट विश्वाला लागून राहिलेली अनेक दिवसांपासूनची भारत-पाक सामन्यांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. २४ तारखेला भारत-पाक सामना होणार आहे. परंतु यावरून आता टीकाही होऊ लागली आहे. ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहाद उल मुस्लिमीनचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी आम्हाला भारताच्या पंतप्रधानांना विचारायचे आहे की सैन्याचे नऊ सैनिक मारले गेले आहेत आणि २४ तारखेला भारत आणि पाकिस्तानचा टी २० सामना आयोजित करण्याची तयारी करण्यात येत आहे. दरम्यान, भारतीय सैनिक मरत आहेत आणि मनमोहन सिंग सरकार पाकिस्तानला बिर्याणी खायला घालत आहे, असे तुम्ही म्हटले होते ना? नऊ सैनिकांचा मृत्यू झाल्यानंतर तुम्ही टी २० खेळणार आहात? आज पाकिस्तान काश्मीरमध्ये भारतीयांच्या जीवाशी टी २० खेळत आहे, पण तुम्ही काय करत आहात? आयबी, अमित शाह काश्मीरमध्ये काय करत आहेत?,” असा सवाल ओवेसी यांनी केला आहे.
“जेव्हा पाकिस्तानने पुलवामा हल्ला केला, तेव्हा मोदी म्हणाले की आम्ही घरात घुसून मारू, मग आम्ही मारा असे सांगितले. आता चीन डोकलाम, डेपसांगमध्ये बसला आहे आणि भारताचे पंतप्रधान काहीच करत नाहीत. त्यांना चीनबद्दल बोलायला भीती वाटते.
“पाकिस्तानकडून दहशतवादी, हत्यारे येत आहेत. आपण सीजफायर केले आहे, पण ड्रोनमधून शस्त्रे येत आहेत. दहशतवादाला सामोरे जाण्यासाठी तुमच्याकडे कोणतेही धोरण नाही. काश्मीरमध्ये ज्या प्रकारे टार्गेट किलिंग होत आहे त्याला सामोरे जाण्यासाठी तुमच्याकडे कोणतेही धोरण नाही,” असे ओवेसी यांनी म्हटले आहे.