मणगुत्ती येथील घटनेवर पडदा : तिन्ही गावातील ग्रामस्थांचा निर्णय
प्रतिनिधी/ संकेश्वर
सीमाभागासह महाराष्ट्रात चर्चेचा विषय बनलेल्या मणगुत्ती येथील छ. शिवरायांच्या पुतळा प्रतिष्ठापनेवरुन निर्माण झालेला वाद अखेर सामोपचाराने मिटविण्यात आला. मंगळवारी मणगुत्तीसह बेनकनहोळी व बोळशनट्टी येथील गावप्रमुखांची बैठक मणगुत्ती सरकारी शाळेत घेण्यात आली. यावेळी गावच्या वेशीवर असलेल्या बसवेश्वर मंदिरनजीक पाच महापुरुषांचे पुतळे उभारण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला. यानंतर अधिकाऱयांच्या उपस्थितीत सदर कामाचे भूमिपूजनदेखील करण्यात आले.
मणगुत्ती येथे 5 ऑगस्ट रोजी छ. शिवाजी महाराजांच्या पुतळय़ाची प्रतिष्ठापना केल्यानंतर अवघ्या 12 तासात बेनकनहोळी व बोळशनट्टी येथील काही जणांनी विरोध केल्यामुळे पोलीस बंदोबस्तामध्ये पुतळा उतरविण्यात आला होता. याचे सीमाभागासह महाराष्ट्रात तीव्र पडसाद उमटले होते. शिवप्रेमींसह सर्वच स्तरातून या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला. यानंतर मंगळवारी तिन्ही गावातील प्रमुखांची बैठक झाली. यामध्ये सर्वानुमते मणगुत्ती गावच्या वेशीवर छ. शिवरायांसह महात्मा बसवेश्वर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महर्षि वाल्मिकी व भगवान श्रीकृष्ण यांचे पुतळे उभारण्याचा निर्णय घेण्यात आला.
यानंतर सीपीआय गुरुराज कल्याणशेट्टी, पोलीस उपनिरीक्षक रमेश पाटील यांच्या उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते सदर कामाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी बोलताना मणगुत्ती गावचे शरद पाटील म्हणाले, तिन्ही गावातील ग्रामस्थांच्या सहकार्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. गावात सर्व समाजामध्ये शांतता राखून एकोपा रहावा, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांत सदर घटनेवेळी कर्नाटक व महाराष्ट्रातील जनतेसह प्रशासनाने सहकार्य केल्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
लवकरात लवकर हे पुतळे उभारणार आहोत. सर्वांनी एकमुखाने हा निर्णय घेतला असून कोणीही गैरसमज पसरवू नये, असे आवाहनदेखील त्यांनी केले. याप्रसंगी अर्जुन घस्ती, बसवराज धरणट्टी, सुरेश बेन्नी, बसवराज भूजापगोळ, आर. के. देसाई यांच्यासह तिन्ही गावातील प्रमुख नेते, ग्रामस्थ, शिवप्रेमी उपस्थित होते.