विशाल कदम/ सातारा
वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वनचरे… या संत तुकाराम महाराजांच्या अभंगातील उक्तीप्रमाणे सातारा शहर हरित शहर करण्यासाठी पालिकेच्यावतीने दरवर्षी झाडे लावण्यात येतात. यावर्षी वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत झाडे लावण्याचे ठरले. झाडे खरेदी करुन लावण्याच्या विषयाला त्या बैठकीत चर्चा झाली खरी परंतु पावसाळा सुरु झाला अन् झाडांचे वृक्षारोपण करण्याचे विसरुनच गेले. शुक्रवारी उपाध्यक्ष मनोज शेंडे यांच्याकडे विचारणा करताच त्यांनी प्राधान्याने लक्ष घालून झाडे लावण्याबाबत नेमकी काय प्रक्रिया झाली त्याची विचारणा करण्यात आली. त्यांनी सूचना दिल्यानंतर क्विक ऍक्शन घेवून कार्यंवाहीला सुरुवात झाली आहे.
सातारा शहरात गेल्या चार वर्षापुर्वी वृक्ष लागवड करण्यात आली होती. ती वृक्ष sलागवड एका कंपनीला दिली होती. अमृत योजनेच्या माध्यमातून ती वृक्ष लागवड होती. त्याचबरोबर दरवर्षी सातारा पालिका वृक्ष लागवड करते. गतवर्षी कोरोनामुळे वृक्ष लागवडीकडे दुर्लक्ष झाले होते. यावर्षीही वृक्ष विभागाच्या झालेल्या बैठकीत अडीच हजार झाडे लावण्याचा विषय चर्चेला गेला अन् त्यास मंजूरी देण्यात आली. त्यानुसार वृक्ष प्राधिकरणाच्या समितीत चर्चा होवूनही तब्बल दोन महिन्याच्या कालावधीत काहीच हालचाल झालेली नव्हती. कोरोनाच्या कारणास्तव वृक्ष लागवडीच्या मुद्याकडे पाठ फिरवल्याचे दिसून येत होते. जुन, जुलै या दोन महिन्यात वृक्षारोपण करण्यात येते. परंतु पालिकेने झाडांच्या रोपांची खरेदी करण्यात आली असल्याची बाब उपाध्यक्ष मनोज शेंडे यांच्या निदर्शनास येताच त्यांनी वृक्ष प्राधिकरण विभागाचे प्रमुख प्रणव पवार यांच्याकडून माहिती घेवून त्यांना तातडीने झाडे खरेदी करा अन् लवकरात लवकर झाडे लावा, अशा सूचना दिल्या. त्यांच्या सुचना मिळताच वृक्ष प्राधिकरण विभागाकडून झाडे खरेदी करण्यासाठी नर्सरीवाल्यास फोन करुन लगेच झाडे मागणी करण्यात आली आहेत.
तसेच अडीच हजार झाडांमध्ये 1500 झाडे ही बांबूची असुन ती झाडे सोनगाव कचरा डेपोत लावण्यात येणार आहेत. उरलेली झाडे शहरात लावण्यात येणार आहेत. उपाध्यक्ष मनोज शेंडे यांनी सूचना देताच क्विक ऍक्शन होवून कार्यवाहीसाठी हालचाली सुरु झाल्या आहेत.
हुतात्मा स्मारकाच्या परिसरात पालिकेची होणार नर्सरी
दरवषीं सातारा पालिकेला वृक्ष लागवडीकरता मोठमोठी झाडे इतर नर्सरीतून खरेदी करावी लागतात. त्याकरता ज्यादा निधी खर्च होतो. परंतु सातारा पालिकेकडे स्वतःची नर्सरी असल्यास पैशाची बचत होणार आहे. अशी संकल्पना पुढे येवून हुतात्मा स्मारकात नर्सरी तयार करण्यात येणार आहे. यावर्षीपासून हुतात्मा स्मारकामध्ये अग्निशमन केंद्राच्या बाजूला मोकळा जो परिसर आहे. तेथे ही नर्सरी करण्यात येणार आहे. झाडांच्या रोपाची लागण करण्यात येणार आहे.
लवकरच वृक्षारोपणाचा कार्यक्रम
एकदा मनावर घेतले की तो कार्यक्रम शेवटपर्यंत नेण्यामध्ये उपाध्यक्ष मनोज शेंडे यांचा हातखंडा आहे. त्यांनी वृक्षारोपणाच्या प्रकरणात लक्ष घातले असून लवकरच वृक्षरोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याचे समजते.