नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारतातील नागरिकांसाठी 2021 च्या दुसऱया तिमाहीपर्यंत स्वदेशी लस उपलब्ध असेल, अशी माहिती भारत बायोटेक कंपनीच्या अधिकाऱयाने दिली आहे. कंपनीचे लक्ष्य सध्या देशभरातील लसीच्या चाचण्यांचा टप्पा यशस्वीरित्या पूर्ण करण्यावर आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) – नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ व्हायरोलॉजी (एनआयव्ही) यांच्या सहकार्याने भारत बायोटेकने ही लस तयार केली आहे. शेवटच्या टप्प्यातील चाचणीचा डेटा हा सुरक्षित आणि यशस्वीरित्या पार पडल्यानंतर ही लस बाजारात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या लसीची किंमत किती असेल याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही.
देशावर कोरोनाचे दुष्ट संकट ओढावलेले असतानाच या संकटावर मात करणारी स्वदेशी कोरोना प्रतिबंधक लस कधी येणार याकडे सर्व देशवासियांचे डोळे लागलेले आहेत. त्यातच आता भारत बायोटेक कंपनीचे संचालक साई प्रसाद यांनी या लसीबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. ‘भारत बायोटेक’ने तयार केलेल्या कोरोना लसीच्या तिसऱया टप्प्यातील चाचणीला नुकतीच परवानगी मिळाल्यानंतर ही सर्वात महत्त्वपूर्ण माहिती असल्याचे समोर येत आहे.
भारत बायोटेक कंपनीने निर्मिलेली लस नागरिकांना 2021 च्या दुसऱया तिमाहीपर्यंत उपलब्ध होऊ शकेल, अशी माहिती कंपनीकडून रविवारी देण्यात आली. या लसीची चाचणी साधारण 14 राज्यांमध्ये 24 ते 25 वेगवेगळय़ा रुग्णालयांमध्ये सुरू आहे. प्रत्येक रुग्णालयात जवळपास 2,000 स्वयंसेवकांवर या लसीची चाचणी सध्या सुरू आहे. या लसीचे उत्पादन केल्यानंतर सरकारी रुग्णालयांमध्ये तसेच सरकारी रुग्णालयांना औषध पुरवणाऱया दुकानांना किंवा कंपन्यांना या लसीचा पुरवठा करण्यासंदर्भात विचार सुरू आहे.