प्रतिनिधी/ सातारा
सध्या सुरु असलेले सातारा ते मिरज डबल ट्रकची सद्यस्थिती काय आहे, निरा, वाठार, रहिमतपूर, पळशी, ताकारी याठिकाणी ओव्हरब्रिजचे सुरु असलेल्या कामे कधी पूर्ण होणार, या कामांची मुदत किती आहे, सातारा येथे मालगाडय़ांसाठी वेअर हाऊस उभारणेच्या कामाचे आणि पुणे-सातारा विद्युत इंजिन वाहतुकीची आत्ताची परिस्थिती काय आहे, अशा प्रश्नांची विचारणा करत, पुणे-सातारा-कराड रेल्वेची शटल सेवा सुरु करावी अशी आग्रही मागणी पुणे रेल्वे विभागाच्या डिआरएम रेणु शर्मा यांच्याकडे खासदार उदनराजे भोसले यांनी केली.
भारतीय रेल्वे सर्वसामान्य प्रवाशांचे आणि माल वाहतुकीचे मुख्य साधन आहे, हे सार्थ ठरवण्यासाठी सुरु असलेले रेल्वे प्रकल्प वेळेत पूर्ण करावेत. नवीन प्रकल्प सुधारणांचे प्रस्ताव द्या, आमचे नेहमीच त्यासाठी सहकार्य व पाठपुरावा राहील अशी आश्वासक भुमिका त्यांनी मांडली.
पुणे रेल्वे विभागाच्या डिआरएम रेणु शर्मा यांच्यासमवेत खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी भारतीय रेल्वेच्या विभागीय मुख्यालयाच्या कार्यालयात बैठक घेतली. त्याबैठकीत भारतीय रेल्वे प्रशासनाशी निगडीत, पुणे विभागातील सुरु असलेल्या विविध कामांचा आढावा घेताना ते बोलत होते.
आम्ही प्रस्तावित केलेले सातारा येथील सुशोभिकरण तसेच वाठार रेल्वे स्टेशनचे पूरातन स्थापत्य वास्तुकला दर्शवणारे सुशोभिकरण ही कामे लवकर पूर्ण झाली पाहिजेत. सातारा-मिरज रेल्वे ट्रकच्या दुहेरीकरण आणि कराड-चिपळुण नवीन रेलट्रक ही कामे आव्हानात्मक आहे. रेल्वेच्या दळणवळणाची गती चौपट पाचपट होण्याबरोबरच सर्वांच्या अमुल्य वेळेची बचत होणार आहे.
रेल्वे-क्रॉसिंगसाठी रस्ते वाहतुक थांबवणे ही कृती अजुनही ब्रिटीशकाळात असल्याची जाणिव वाटणारी आहे, त्यामुळे नागरिकांच्या हितासाठी लोणंद, पळशी, निरा, सातारा, रहिमतपूर, ताकारी येथील मुख्य रेल्वे क्रॉसिंगच्या ओव्हरब्रिजचे कामाला गती देऊन ती कामे वेळेत पूर्ण करणे आपली जबाबदारी आहे.
सातारा आणि कराडवरुन दररोज पुणे येथे प्रवास करणारांची संख्या निश्चितच मोठी आहे. या मार्गावर नोकरीच्या वेळेत शटल सेवा सुरु केल्यास, रेल्वेला नवीन उत्पन्न मिळण्याबरोबरच रस्त्याने प्रसाव करणाऱया प्रवाशांना प्रवासाचा शिण वाटणार नाही. यासाठी तातडीने पावले उचलावीत. शटल सेवा सुरु करण्याचा प्रस्ताव पूर्वी दिला होता. त्यातील तृटी दूर करुन, परिपूर्ण प्रस्ताव द्यावा. सालपे ते वाठार- 100 कि.मी. प्रतितास आणि जेजुरी ते वाठार 130 कि.मी. प्रतितास वेग ठेवण्याबाबतचे नियोजन अंमलात आणावे,
ट्रेन नंबर 12630 कर्नाटका संपर्क क्रांती व्हाया पुणे-सातारा जाणाऱया गाडीला सातारा येथे 2 मिनीटांचा थांबा मिल्ट्री लोकांसाठी आवश्यक आहे. कोरोनाने इंटरनेट सेवेचा लाभ घेणाऱया व्यक्तींची संख्या लक्षणीय वाढली आहे. येथुन पुढे इंटरनेटवरच सर्व काही होणार आहे. त्यासाठी लहान स्थानकावर ऑनलाईन तिकिट सेवा उपलब्ध करुन देण्याची व्यवस्था झाली पाहिजे.
रेल्वेची मालवाहतुक तुलनात्मकदृष्टया सर्वांत स्वस्त वाहतुकीचे साधन आहे. सातारा हे जिल्हा मुख्यालय आहे. या ठिकाणावरुनच संपूर्ण जिल्हय़ात विविध वस्तुंचा पुरवठा होत असतो. त्यामुळे सातारा येथे माल धक्का उभारल्यास, त्याचा लाभ व्यापाऱयांबरोबरच शासनाला होणार आहे. मालधक्का उभारण्याच्या कामात कोणती समस्या असण्याचे कारण नसावे.
रेल्वेमार्ग दुहेरीकरण, ओव्हरब्रिज, सुशोभिकरणासारखी महत्वाची कामे ही दिर्घकाळ वापरात येणारी आहेत. त्यामुळे ती निश्चितच दर्जेदार आणि चिरकाल टिकणारी मजबुत झाली पाहिजे अशा महत्वाच्या सूचना बैठकीत खासदार उदयनराजे भोसले यांनी दिल्या.
रेल्वे प्रशासनाने, योग्य खबरदारी घेऊन कोरोनामुळे आलेली मरगळ झटकून टाकून नवीन कामे प्रस्तावित केली पाहिजेत, अशी अपेक्षा देखिल उदयनराजे भोसले यांनी यावेळी व्यक्त केली.
यावेळी विभागीय रेल्वे कार्यालयातील विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते.