पणजीत शतकाच्या उंबरठय़ावर : आगामी चार दिवसात मुसळधार
प्रतिनिधी / पणजी
राज्यात मुसळधार पाऊस सुरू झाला असून आगामी 4 दिवस त्याचा जोर कायम राहिल. दि. 7 ऑगस्ट रोजीपर्यंत जोरदार वादळी वाऱयासह पावसाचा इशारा पणजी वेधशाळेने दिला आहे.
मान्सून सक्रिय झालेला आहे. आता पावसाने थोडी दिशा बदललेली आहे. पूर्वेकडून पाऊस गोव्यात येत आहे. पुढील 4 दिवस राज्यात मुसळधार पाऊस पडेल. वरील काळात खराब हवामानामुळे समुद्र खळवळलेला असेल. लाटा 4 मीटर उंचीपर्यंत जाण्याची शक्यता आहे. मच्छिमारांनी खोल समुद्रात जाऊ नये असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. दि. 4 व 5 ऑगस्ट रोजी मुसळधार पाऊस पडेल, असेही वेधशाळेने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे. काही भागात पुढील 4 दिवस मुसळधार पाऊस कोसळणार, असा इशारा देण्यात आला आहे.
गेल्या 24 तासात पणजीत 2 इंच पाऊस झाला. दुपारपासून पणजीसह राज्यातील अनेक भागाना पावसाने झोडपून काढण्यास प्रारंभ केला. जोरदार वादळी वाऱयासह सर्वत्र पाऊस पडला. पणजीत सायंकाळी उशिरापर्यंत पावसाचा जोर कायम होता.
गेल्या 24 तासांत पेडणेत सर्वाधिक म्हणजे 3 इंच पाऊस झाला. म्हापसा, फोंडा, पणजी, जुने गोवे, सांखळी, वाळपई, केपे या भागात प्रत्येकी 2 इंच पाऊस झाला. काणकोण, दाबोळी, मडगाव येथे प्रत्येकी 1 इंच तर मुरगावात 3 इंच पावसाची नोंद झालेली आहे. सांगेमध्ये सर्वात कमी 8.9 मि.मी. एवढी पावसाती नोंद झाली.
चार ठिकाणी पावसाचे शतक
राज्यात पावसाचा वाढता जोर लक्षात घेता पणजीसह अन्य काही केंद्रे लवकरच शतक ओलांडण्याची शक्यता आहे. पेडणे, सांखळी, जुने गोवे, काणकोण या केंद्रांमध्ये पावसाने शतक ओलांडले आहे. आश्चर्याची बाब म्हणजे सर्वाधिक पाऊस नोंदविणाऱया वाळपई केंद्रामध्ये मात्र पावसाचा प्रभाव अद्याप कमीच आहे. पणजीत 98 इंच पावसाची आतापर्यंत नोंद झालेली आहे तर वाळपईत आतापर्यंत केवळ 89 इंच पावसाची नोंद झालेली आहे. पणजी आज पावसाचे शतक पूर्ण करेल, अशी शक्यता आहे.