जिल्हा कोविड रुग्णालयातील धक्कादायक प्रकार : नातेवाईकांकडून हंगामा
मनुष्यबळ कमी पडत असल्याने कोविड आयसीयूमधील प्रकार
जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी करणार घटनेची चौकशी
प्रतिनिधी / सिंधुदुर्ग:
जिल्हा रुग्णालयातील कोविड कक्षात रुग्ण सेवेसाठी मनुष्यबळ कमी पडू लागल्याने आता कोविड पॉझिटिव्ह रुग्णांच्या नातेवाईकांकडूनच कोविड रुग्णांची सेवा करून घेतली जात असल्याची खळबळजनक बाब उघडकीस आली आहे. अगदी थेट कोविड आयसीयू विभागात रुग्णांची हलवाहलव, ऑक्सिजन सिलिंडरची ने-आण, रुग्णांना पाणी देणे, जेवण देणे, कपडे बदलणे ते अगदी डायफर बदलणे ही कामे देखील करून घेतली जात असल्याची बाब उघडकीस आली आहे.
दरम्यान याबाबत रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णालयात हंगामा केल्यानंतर जिल्हाधिकाऱयांच्या कानावर ही गोष्ट घालण्यात आली. याबाबत आपण तातडीने चौकशी करीत असल्याचे जिल्हाधिकाऱयांनी स्पष्ट केले.
कोविड रुग्णालय म्हणून कार्यरत असलेल्या जिल्हा रुग्णालयात दिवसागणिक रुग्णांची संख्या मोठय़ा प्रमाणावर वाढू लागली आहे. रुग्ण ठेवण्यासाठी आता खाटा अपुऱया पडू लागल्या आहेत. रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर व कर्मचाऱयांना कोरोनाची लागण होण्यास सुरुवात झाल्याने त्यांना क्वारंटाईन व्हावे लागत आहे. त्यामुळे खासगी डॉक्टरांची मदत घ्यावी लागत आहे. मात्र या आणिबाणीच्या परिस्थितीत एवढय़ा मोठय़ा संख्येने दाखल होणाऱया रुग्णांच्या सेवेसाठी कर्मचारी कमी पडू लागल्याने आता पॉझिटिव्ह रुग्णांच्या नातेइर्वाकांकडूनच रुग्णांची सेवा करून घेण्याचा पायंडा या रुग्णालयात सुरू झाल्याचे आढळून आले आहे.
या कोविड रुग्णालयाच्या आयसीयू कक्षात पीपीई किट न घातलेले रुग्णांचे नातेवाईक आपापल्या रुग्णांची काळजी घेताना दिसत आहेत. रुग्णांना स्ट्रेचरवरून नेणे, बेडवर ठेवणे, ऑक्सिजन सिलिंडरची हलवाहलव, रुग्णांची स्वच्छता, पाणी, जेवण भरवणे ही कर्मचाऱयांची कामे आपल्याकडून करून घेतली जात असल्याची बाब रुग्णांच्या नातेवाईकांनी गुरुवारी ‘तरुण भारत’च्या निदर्शनास आणली. या नातेवाईकांनी या घटनेविरुद्ध हंगामाही केला. ही बाब आम्ही जिल्हाधिकारी आणि वृत्तपत्रांसमोर नेणार, असे सांगताच यापुढे असं होणार नसल्याचे कोविड कक्षातील अधिकारी व कर्मचाऱयांनी सांगून संतप्त नातेइवाईकांना गप्प केल्याचे निदर्शनास आले आहे.
जिल्हा रुग्णालयात डॉक्टर, कर्मचारी कमी पडू लागले, ही बाब जरी खरी असली, तरी पॉझिटिव्ह नसलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना जाणूनबजून धोक्यात घालण्याची ही बाब गंभीर आहे. आरोग्य प्रशासनाचे हे अपयश म्हणावे लागेल. जिल्हाधिकाऱयांनी याबाबत तातडीने पाऊले उचलावीत. अन्यत: यात नाहक बळी जाण्याचे प्रकार वाढण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.