प्रतिनिधी / बेळगाव
बेळगाव येथील प्रगतशील लेखक संघ आणि एल्गार सामाजिक साहित्य परिषद यांच्यावतीने शुक्रवारी ‘घेतो पीक आम्ही हो शब्दांचे’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्राचार्य आनंद मेणसे यांच्या अध्यक्षतेखाली बेळगाव परिसरातील कवींच्या एकापेक्षा एक सरस कवितांनी कार्यक्रम पार पडला.
नात्यातील वाढती दरी आणि यातही माणसाला सावरणारे शब्द, भाऊबंदकीतील टोकाचा संघर्ष, स्त्री जातीची उपेक्षा, अशा जगण्यातला विस्तव आणि वास्तव मांडणाऱया शब्दांनी रसिक श्रोत्यांचा ठाव घेतला. वैविध्यपूर्ण विषयाधारित कवितांनी रसिकांची वाहवा मिळविली. रोशनी हुंदरे यांनी किन्नर लोकांच्या मानसिक अस्वस्थतेचा उलगडा केला. संदीप मुतगेकर यांनी वेदनेच्या तीव्रतेची जाणीव करून देतानाच रसिकांना भावुक केले. भरत गावडे यांनी कवितेतून पुस्तके वाचण्याचा संदेश दिला. ग्लोबलायझेशन या कवितेतून चंद्रशेखर गायकवाड यांनी परिस्थितीचे कथन केले.
शिवाय विजया उरणकर यांनी थांब आता तू, आर. के. ठाकुर-देसाई यांनी आरती मदिरेची, प्रा. मनीषा नाडगौडा यांनी लढवय्या, प्रा. मयूर नागेनहट्टी यांनी काय हे जगणे, तुकाराम कुराडे यांनी पुढारी, राजन कळविकट्टी यांनी विधी, प्रा. परशुराम कामती यांनी पाऊस, सतीश जुटेकर यांनी काव्यमग्न पुरुषाचे आत्मभान, चंद्रकांत देसाई यांनी संसार या कविता सादर केल्या. परशराम खेमणे, स्मिता किल्लेकर, तुकाराम अडकुरकर, शारदा भेकणे आदींनी कविता सादर केल्या. अध्यक्षीय समारोपात प्राचार्य आनंद मेणसे यांनी कवींना मार्गदर्शन केले. प्रा. अशोक अलगोंडी यांनी सूत्रसंचालन केले.