11 मेपर्यंत एक्सप्रेस रद्द करण्याचा निर्णय
प्रतिनिधी / मिरज
कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे प्रवासी संख्या घटल्याने कोल्हापूर-मुंबई आणि मुंबई-कोल्हापूर महालक्ष्मी एक्सप्रेस 11 मेपर्यंत रद्द करण्यात आली आहे. प्रवाशांचा अल्पप्रतिसाद मिळत असल्याने मध्य रेल्वे प्रशासनाने दहा गाड्या रद्द केल्या असून, महालक्ष्मी एक्सप्रेस ही महत्त्वाची रेल्वे गाडी होती. प्रवाशांचा प्रतिसाद मिळू लागल्यानंतर पुन्हा ही रेल्वेगाडी सुरु करण्याचा रेल्वे प्रशासनाचा विचार आहे.
राज्यात कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक झाला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता अन्य व्यवहार बंद आहेत. रेल्वे प्रशासनाने रेल्वे सेवा सुरूच ठेवली होती. मात्र, सध्या संचारबंदी आणि जिल्हाबंदी असल्याने प्रवासी संख्या कमालीची घटली आहे. त्यामुळे रेल्वेलाही तोटा सहन करावा लागत आहे. नियमित मार्गावर धावणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्याही प्रवाशांविना धावत आहेत. त्यामुळे प्रवासी नसल्याने रेल्वे गाड्या रद्द करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला असून, अनेक गाड्या रद्द करण्यात येत आहेत.