ऑनलाईन टीम / लखनऊ :
उत्तरप्रदेशच्या आग्रा येथील जगदीशपुरात एका सफाई कामगाराचा पोलीस कोठडीत मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. त्याच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियंका गांधी आग्य्राला जात होत्या. त्यावेळी उत्तरप्रदेश पोलिसांनी यमुना एक्सप्रेस वेवर त्यांना रोखून ताब्यात घेतले. दरम्यानच्या काळात पोलीस व काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये वादावादी झाली. वातावरण चिघळण्याची शक्यता निर्माण झाल्याने पोलिसांनी त्या ठिकाणी कलम 144 लागू केले आहे.
त्यानंतर प्रियंका गांधी यांनी या घटनेच्या निषेधार्थ एक ट्विट केले आहे. ‘एखाद्याला पोलीस कोठडीत मारहाण करून ठार करणं हा कुठला न्याय आहे? आग्रा पोलीस कोठडीत अरूण वाल्मिकीच्या मृत्यूची घटना निंदनीय आहे. भगवान वाल्मिकी यांच्या जयंतीच्या दिवशी उत्तर प्रदेश सरकारने त्यांच्या संदेशाविरोधात काम केलं आहे. उच्चस्तरीय चौकशी व पोलिसांवर कारवाई झाली पाहिजे. तसेच पीडित कुटुंबास भरपाई दिली जावी, असे प्रियंका गांधी यांनी म्हटले आहे.