वृत्तसंस्था /दुबई :
यंदाची आयपीएल स्पर्धा प्रेक्षकांविना खेळवली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर संघाचा कर्णधार विराट कोहलीने प्रेक्षकांशिवाय खेळावे लागणार असले तरी खेळाडूंचा जोश यामुळे कमी होणार नाही, तो नेहमीसारखाच असेल, असा दावा केला आहे. संघसहकाऱयांना आता ‘बायो-बबल’ वातावरणाची सवय झाली असून त्यांनी ते पूर्णपणे स्वीकारले आहे, असेही तो म्हणाला. यंदाची आयपीएल स्पर्धा उद्यापासून (शनिवार दि. 19) संयुक्त अरब अमिरातीत खेळवली जाणार आहे.
‘माझ्या मते, आमच्या खेळाडूंनी ‘बायो-बबल’ला लवकर स्वीकारले आहे आणि त्याची आवश्यकता त्यांना रुचली आहे. पहिल्या दिवसापासूनच सर्व सहकाऱयांनी सहकार्य केले आहे’, असे विराट कोहली आभासी पत्रकार परिषदेत म्हणाला.
‘ज्यावेळी आम्हाला बायो-बबल’ची संकल्पना समजावून देण्यात आली, त्यावेळी अनेक कंगोऱयांनी आम्ही चर्चा केली आणि त्याचे फायदे-तोटेही समजावून घेतले. जर आम्ही ही संकल्पना स्वीकारली नसती तर आम्ही उदास असतो, निराश असतो. पण, आमच्या संघातील एकही खेळाडू निराश नाही. उलटपक्षी, सर्वांनी ही संकल्पना स्वीकारली आहे आणि त्यासाठी हवे ते सहकार्य केले आहे’, असे विराटने पुढे नमूद केले.
‘भरगच्च भरलेल्या स्टेडियमशिवाय प्रथमची आयपीएल सामने खेळवले जात आहेत. पण, ही वेळेची गरज आहे, असे आरसीबीच्या या अव्वल फलंदाजाने नमूद केले. ‘मुळात प्रेक्षक नसताना खेळायचे, ही संकल्पनाच मानवणारी नाही. मी देखील हे मान्य करतो. पण, सराव सत्रे आणि सराव सामन्यानंतर आम्ही त्या मानसिकतेत खेळण्याची तयारी केली आहे. स्टेडियममधील चाहते हा खेळाच्या मुख्य घटकांपैकी एक असतात. पण, केवळ त्या एकाच घटकासाठी आपण खेळत नाही, हे देखील लक्षात घ्यायला हवे’, याचा त्याने शेवटी उल्लेख केला.