कोलकाता \ ऑनलाईन टीम
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली तृणमूल काँग्रेसने बंगालचा गड राखण्यात यश मिळवले आहे. मात्र, त्यांची अवस्था गड आला पण सिंह गेला अशी झाली आहे. नंदीग्राम मतदारसंघातून त्यांना पराभूत जाहीर करण्यात आले आहे. सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये पिछाडीवर असल्याने ममता बॅनर्जींचा पराभव होण्याची शंका निर्माण झाली होती. पण नंतर ममता बॅनर्जी यांनी जोरदार मुसंडी मारली आणि भाजपाचे सुवेंदू अधिकारी यांचा १२०० मतांनी पराभव केला, असे वृत्त होते. मात्र, निवडणूक आयोगाने ममता बॅनर्जी यांना 1700 हून अधिक मतांनी पराभूत घोषिक केले.
दरम्यान, ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर आक्षेप घेतला आहे. या निकाला विरोधात न्यायालयात जाणार असून पुन्हा मतमोजणी करण्याची मागणी केली आहे.
नंदीग्रामचा निकाल लागल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी आपल्या निवासस्थानी उपस्थित कार्यकर्ते आणि प्रसारमाध्यमांशी संवाद साधत मतदारांचे आभार मानले. तुम्ही माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल धन्यवाद अशा शब्दांत त्यांनी आभार मानले. तसेच कोणीही विजयी मिरवणूक काढू नये अशी विनंती देखील त्यांनी यावेळी केली. सर्वांनी आपापल्या घरी जावं असं आवाहन ममता बॅनर्जी यांनी निवासस्थानाबाहेर जमलेल्या समर्थकांना केलं असून संध्याकाळी ६ नंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधणार असल्याची माहिती त्यांच्याकडून देण्यात आली. संध्याकाळी त्या माध्यमांशी काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.