पणजी:
राज्यातील सरकारी, निमसरकारी आणि खासगी कर्मचाऱयांचे सार्वजनिक बससेवेआभावी अक्षरशः हाल झालेले असून काही सरकारी कार्यालयांमध्ये देखील केवळ नियमांवर बोट ठेऊन अधिकारी बसलेले असल्याने कर्मचाऱयांमध्ये संताप पसरला आहे. खासगी क्षेत्रात अनेक कर्मचारी आपल्या नोकरीला मुकण्याची शक्यता आहे.
सध्या सार्वजनिक बससेवा सुरळीतपणे सुरू झालेली नाही. कदंबच्या काही बसेस धावतात, मात्र एकेका बसमध्ये एका सीटवर एकच प्रवासी बसण्याचा सोशल डिस्टन्सिंगचा नियम असल्यामुळे एका बसेसमध्ये जेमतेम 15 ते 20 प्रवासी जातात.
हजारो कर्मचाऱयांचे होतात हाल
प्रत्यक्षात कामावर जाणारे हजारो कर्मचारी आहेत. त्यातील शेकडो प्रवासी हे केवळ सार्वजनिक बस वाहतुकीवरच अवलंबून असतात. विविध बसस्थानकावर प्रवासी उभे असतात व बसेस कमी पडतात. अखेर शेवटच्या बसेसच्यावेळी एकाचवेळी मोठया संख्येने बसमध्ये प्रवासी घुसतात आणि गर्दी करून जातात. असा हा प्रवास म्हणजे जीवघेणा ठरु शकतो.
वेळेचा ताळमेळ न बसल्याने उडते तारांबळ
सायं. 7 वाजेपर्यंत संबंधित गावात बस पोहोचली पाहिजे या अनुषंगाने बसगाडय़ा सोडल्या जातात. सरकारी तथा निमसरकारी कार्यालये सायं. 5.50 वाजेपर्यंत बंद होतात, तोपर्यंत 5 ते 5.30 पर्यंत अनेक बसेस सुटलेल्या असतात. कारण त्यांना सायंकाळी 7 वाजता इच्छीत स्थळी पोहोचणे आवश्यक असते. मात्र सध्या या वेळेचा ताळमेळ बसत नसल्याने अनेकांना त्रास सहन करावे लागत आहेत.
अधिकाऱयांकडून कर्मचाऱयांची होतेय सतावणूक
अनेक कार्यालयांतील अधिकारीवर्ग कर्मचाऱयांना वेळेचे बंधन घालतात. प्रामुख्याने सरकारी महामंडळातील वरिष्ठ अधिकारी जे स्वतः आलीशान गाडीतून येतात ते कनिष्ठ कर्मचारीवर्गाला 5.45 पूर्वी कार्यालयातून सोडत नाहीत. तसेच सकाळी 9.30 वाजेपर्यंत कामावर हजर झाले नाही तर लाल शेरा मारतात. या प्रकाराने कर्मचारीवर्गाचे हाल झालेले आहेत. लॉकडाऊन जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत दिवसाआड एकदा सरकारी व निमसरकारी कर्मचाऱयांना सेवेत बोलविणे हाच एकमेव पर्याय अथवा संबंधित कर्मचाऱयांची वाहतुकीची तरी व्यवस्था करणे आवश्यक आहे.