-चौपदरी मार्ग, 45 मीटर रुंदी : प्रकल्प संचालक पंडरकर यांची माहिती
-प्रथमदर्शनी संकेश्वर-आंबोली-माडखोल-बावळाटमार्गे बांदा मार्ग
-कमी वेळेत गाठता येणार पश्चिम महाराष्ट्र
-आंबोली घाटमार्गाचेही होणार चौपदरीकरण
मयुर चराटकर / बांदा:
संकेश्वर-बांदा या महत्वाकांक्षी 108 किलोमीटरच्या महामार्गाला मंजुरी मिळाली असून येत्या वर्षभरात तांत्रिक बाबींची पूर्तता करण्यात येणार आहे. तसेच हा मार्ग चौपदरी असून रुंदी 45 मीटर राहणार आहे. विशेष म्हणजे आंबोली घाटसुद्धा चौपदरी करण्यात येणार आहे. महामार्गासाठी लागणाऱया जमिनीचे संपादन सरकारी नियमनुसार होणार आहे. या प्रकल्पासाठी अंदाजे दोन हजार कोटी रुपये खर्च असून प्रथमदर्शनी हा महामार्ग सावंतवाडी शहरातून न जाता संकेश्वर-आंबोली-माडखोल-बावळाटमार्गे बांदा असा होणार असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग विभागाचे प्रकल्प संचालक वसंत पंडरकर यांनी ‘तरुण भारत’ला दिली.
आधीच मुंबई-गोवा महामार्ग सावंतवाडी शहराबाहेरून गेल्याने सावंतवाडीचे पर्यटनदृष्टय़ा महत्व कमी झाले आहे. याचा परिणाम तेथील अर्थकारणावर झाला आहे. आता नव्याने होणारा संकेश्वर-बांदा महामार्ग सावंतवाडी शहराबाहेरून गेल्यास शहराच्या विकासाच्या गतीवर परिणाम होणार आहे. मात्र, प्रत्यक्षात येत्या काळात नेमका काय निर्णय होतो, हे स्पष्ट होईल.
पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱया चौपदरीकरणाची अनेक वर्षे सिंधुदुर्गवासीयांना प्रतीक्षा होती. मुंबईतून सिंधुदुर्ग आणि गोव्यात येण्यासाठी पुणेमार्गे येण्यास अनेकांची पसंती असते. याचे कारण म्हणजे मुंबई-गोवा महामार्ग गेली अनेक वर्षे चौपदरीकरणाच्या प्रतीक्षेत होता. मात्र, सद्यस्थितीत त्या महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्याचबरोबर जिल्हय़ाच्या प्रगतीत भर घालण्यासाठी केंद्र सरकारकडून बांदा-संकेश्वर मार्गाला मंजुरी देण्यात आली आहे. तसेच त्याची कार्यवाहीसुध्दा शासनस्तरावर सुरू झाली आहे. त्यामुळे निपाणीहून सावंतवाडीत येण्यासाठी लागणाऱया वेळेची बचत होणार आहे. अवघ्या दोन तासात बांदा गाठता येणार आहे.
असा असणार महामार्ग
बांदा-संकेश्वर हा चौपदरी महामार्ग 108 किलोमीटरचा असून त्यासाठी सुमारे दोन हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या महामार्गाला केंद्र सरकारकडून तीन-चार वर्षापूर्वी मंजुरी मिळाली आहे. प्रथमदर्शनी हा मार्ग सावंतवाडी शहरातून न जाता संकेश्वर-आंबोली-माडखोल-बावळाटमार्गे-बांदा असा होणार आहे. त्यासाठी आवश्यक बाबींची पूर्तता (प्लानिंग, कॉस्टींग व डिझायनिंग) झाल्यावर निधीचे निश्चितीकरण करण्यात येणार आहे. येत्या वर्षभरात त्या बाबींची पूर्तता करण्यात येणार असून तसा अहवाल दिल्यानंतर सरकारी नियमाप्रमाणे भूसंपादन होऊन मार्ग 45 मीटर रुंदीचा होणार आहे. याबाबतची मोजणी अद्याप झालेली नसून ती येत्या काळात होणार आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाप्रमाणे हे काम होणार असल्याची माहिती प्रकल्प संचालक पंडरकर यांनी दिली.
सिंधुदुर्गच्या विकासाला चालना
सिंधुदुर्ग व गोवा परिसरात जो भाजीपाला, फळे आदींसह जीवनावश्यक बऱयाच वस्तू कोल्हापूर, बेळगाव परिसरातून येतात. लवकरात लवकर हा महामार्ग झाल्यास येथील अर्थकारणाला गती मिळणार असून भाजीपाला स्वस्त दरात मिळणार आहे. आपल्या जिह्यात मोठी रुग्णालये नसल्याने अनेक रुग्ण उपचारासाठी कोल्ह़ापूर, मिरज भागात जातात. त्यांनादेखील हा मार्ग सोईचा होणार आहे. गंभीर रुग्णाला कमी वेळेत रुग्णालय गाठता येणार आहे. बांधकाम साहित्य आणण्यासाठीही अनेकजण कोल्हापूरला जातात. त्यांनादेखील भाडेदरात सूट मिळणार आहे.
महामार्गाच्या मधोमध आंबोली हे जगप्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण आहे. महामार्ग झाल्यास आंबोलीला अनन्यसाधारण महत्व येणार आहे. प्रशस्त मार्ग झाल्यानंतर या ठिकाणी बारमाही पर्यटक स्थिरावणार असल्याने आंबोलीचे अर्थकारण वाढणार आहे. ज्या भागातून हा महामार्ग जाईल त्या भागाचा विकासही होणार आहे.
महामार्ग सावंतवाडीतून न गेल्यास फटका
जिह्यातील महत्वाचे शहर अशी ओळख असलेल्या सावंतवाडी शहराचे महत्व मुंबई-गोवा महामार्ग बाहेरून गेल्याने काही प्रमाणात कमी झाले आहे. त्यातच रेल्वे टर्मिनस शहराबाहेर असल्याने त्याचाही फटका बसत आहे. आता पशिचम महाराष्ट्राला जोडणारा संकेश्वर-बादा महामार्ग शहराबाहेरून जाणार असल्याचे महामार्ग विभागाकडून सांगण्यात येते. मात्र, तसे झाल्यास सावंतवाडीवासीयांसाठी ती गंभीर बाब ठरणार आहे. झाराप-पत्रादेवी बायपास होण्याआधी सावंतवाडी शहरात पर्यटकांची मोठी संख्या होती. गोव्यात जाणारा प्रत्येक पर्यटक शहरात थांबायचा. त्यामुळे अर्थकारणाला चालना मिळत असे. नवा महामार्ग सावंतवाडी शहराबाहेरून गेल्यास उरले-सुरले अर्थकारण संपुष्टात येण्याची भीती आहे.