राज्यात 30 लाख कामगार : काही कामगार पॅकेजपासून राहणार वंचित
प्रतिनिधी / बेळगाव
लॉकडाऊन काळात बांधकाम कामगारांना प्रत्येकी 3 हजार रुपये देण्याचे सरकारने जाहीर केले आहे. त्याचे आम्ही बांधकाम संघटनेच्यावतीने स्वागत करतो, असे ऍड. एन. आर. लातूर यांनी म्हटले आहे. पण त्यासाठी 494 कोटींची तरतूद केली आहे. त्यामुळे राज्यातील सर्वच कामगारांना 3 हजार रुपये मिळतील याची शाश्वती नाही. कारण राज्यात 30 लाख कामगार आहेत. त्यांना ही रक्कम पुरणार नाही, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, आम्ही प्रत्येकी किमान 10 हजार रुपये द्यावेत, अशी मागणी केली असताना केवळ 3 हजार रुपये दिले आहेत. हाही आमच्यावर अन्यायच आहे. बेळगाव जिल्हय़ातच 1 लाख 20 हजार कामगार आहेत तर संपूर्ण राज्यात 30 लाख कामगार असल्यामुळे पॅकेजची रक्कम पुरणार नाही, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे कामगारांमध्ये भांडणे लावण्याचाच हा प्रकार आहे.
मागीलवेळी 5 हजार रुपये बांधकाम कामगारांना जाहीर करण्यात आले होते. त्यामध्ये जिल्हय़ातील 65 हजार कामगारांनाच रक्कम मिळाली होती. उर्वरित कामगारांना रक्कम मिळाली नाही. त्यामुळे ते या पॅकेजपासून वंचित आहेत. तेव्हा सर्वांना रक्कम मिळावी यासाठी अधिक निधीची तरतूद करावी, अशी मागणी ऍड. एन. आर. लातूर यांनी केली आहे.