प्रतिनिधी / बेळगाव :
शहरात काही अंशी शिथिलता देण्यात आल्याने बाजारात नागरिकांची वर्दळ वाढली आहे. त्यामुळे ठिक-ठिकाणी वाहतुकीची कोंडी होत आहे. खरेदीसाठी नागरिकांची वाढत असलेली गर्दी कोरोना संसर्गाच्या दृष्टीकोनातून चिंताजनक आहे.
लॉकडाऊनमुळे साधारण दीड महिन्यापासून बाजारपेठ बंद होती. मात्र काही अंशी शिथिलता देताच गेल्या आठवडय़ापासून खरेदीसाठी नागरिकांची गर्दी वाढलेली पहायला मिळत आहे. बुधवारी रविवारपेठमधील कलमठ रोडवर वाहतूक कोंडी झाली होती. रविवारपेठसह मारूती गल्ली, नरगुंदकर भावे चौक, रामदेव गल्ली आदी ठिकाणी वाहतूक वाढली होती. बाजारात येणारे नागरिक तोंडाला मास्क वापरत असले तरी संसर्ग रोखण्यासाठी गर्दी टाळणे गरजेचे आहे. याबरोबरच बाजारात कपडय़ाची दुकाने देखील सुरू झाल्याने नागरिकांची वर्दळ वाढलेली पहायला मिळत आहे.
एकीकडे प्रशासन सोशल डिस्टन्सिंग नियम पाळा असे आवाहन करत आहे. दुसरीकडे मात्र बाजारात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडालेला पहायला मिळत आहे. दिवसेंदिवस गर्दी वाढत असून वाढती गर्दी सद्य परिस्थितीत धोकादायक आहे. रस्त्यावरील गर्दी टाळण्यासाठी बॅरीकेड्स लावून बंदोबस्त करण्यात आला आहे. त्यामुळे इतरत्र रस्त्यांवर वाहतुकीचा ताण पडत असल्याने वाहतुकीची कोंडी होत आहे. लॉकडाऊनमुळे अर्धवट स्थितीत असलेल्या रस्त्यांचे काम देखील हाती घेण्यात आले आहे. स्मार्ट सिटीच्या योजनेंतर्गत चन्नम्मा सर्कलमध्ये कॉंक्रीटीकरण करण्यात येत आहे. त्यामुळे चन्नम्मा सर्कलपासून काकतीवेसकडे जाणारी वाहतूक बॅरीकेड्स लावून बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे बाजारात येणाऱया नागरिकांना इकडून तिकडून फिरत रविवारपेठ गाठावी लागत आहे.