बाजारभोगाव / वार्ताहर
बाजारभोगाव (ता.पन्हाळा ) येथील रेशन धान्य दुकानात शासनाच्यावतीने आलेले रेशनचा गहू, तांदूळ व साखर यांचे वेळेत वाटप करण्यात आले नाही. शिवाय हे धान्य सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आले नाही. त्यामुळे पुरात तेरा टन धान्य भिजून वाया गेले. ज्या गोरगरीबांना या धान्याचाच आधार होता. त्यांच्या दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झाला . सदरच्या भिजलेल्या धान्याचा पंचनामा करून पुरण्यात आले. त्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होताच संतापलेल्या रेशनधारकांनी मोर्चा काढत धान्य वितरण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना चांगलेच धारेवर धरून जाब विचारला. शक्य तितके धान्य बाहेर काढले मात्र अचानक वाढलेल्या पुरामुळे धान्य बाहेर काढता आले नाही. असे सांगून रेशनधारकांची माफी मागून दोन दिवसात प्रत्येक कुटुंबाला धान्य घरपोच करण्याचे आश्वासन संबंधीतांना दिले. यात महसुल विभाग व ग्रामपंचायत प्रशासनाने मध्यस्ती करून वादावर पडदा टाकला. दोन दिवसात धान्य मिळणार असल्याने अखेर मोर्चेकरी शांत झाले.
शेतकरी सहकारी संघाकडे येथील रेशन धान्य वाटपाचा परवाना आहे. ३५० कार्डधारकांना रेशन धान्य वाटप केले जाते. १५ जुलै रोजी साडे नऊ टन गहू, साडे पाच टन तांदूळ असे १५ टन धान्य आले होते. १९ जुलैला वितरणाबाबतची माहीती आली. परंतु सर्व्हर डाऊनमुळे वेळेत वाटप करण्यात आले नाही. याच दुकानाकडे पोर्ले तर्फ बोरगाव येथील रेशन वाटपाची जबाबदारी आहे. त्यामुळे पुर वाढण्याआधी २० व २१ जुलै रोजी तेथील धान्य वाटप करण्यात आले. दरम्यान महापुराचे पाणी रात्रीतच वाढल्याने धान्य बाहेर काढण्यात अडचणी आल्या. तरीही १८ पोती तांदूळ व १५ पोती गहू सुरक्षित स्थळी नेण्यात यश आले. मात्र पाणी वाढल्यामुळे व वाहन उपलब्ध न झाल्यामुळे १३ टन धान्य भिजून गेले.
याबाबत ग्रामपंचायत सभागृहात बैठक सुरू असल्यामुळे सर्वच विभागाचे अधिकारी , कर्मचारी व लोकप्रतिनीधी तिथे असल्यामुळे मोर्चेकऱ्यांनी ग्रामपंचायतीकडे आपला मोर्चा वळवला. यावेळी रेशनधारकांनी धान्य वाटप करणाऱ्यां कर्मचाऱ्यांना चांगलेच धारेवर धरून जाब विचारला. सुमारे तासभर वादावादी सुरू होती. अखेर मॕनेजर सखाराम पाटील व कर्मचारी भिकाजी खराडे यांनी याबाबत माफी मागितली. तसेच दोन दिवसात सर्व कार्डधारकांना धान्य घरपोच करण्याचे आश्वासन दिले. धान्य मिळणार असल्यामुळे सर्व मोर्चेकऱ्यांनी या वादावर पडदा टाकला.
मंडलाधिकारी बी. एस. खोत यांनी दुकान चालकांनी चुकी मान्य केल्यामुळे हा वाद मिटल्याचे सांगून याबाबतचा अहवाल वरिष्ठांकडे पाठवला आहे. दोषी आढळल्यास कारवाई होईल असे सांगितले .