प्रतिनिधी / मडगाव
कोलवा पोलीस स्थानक सद्या धिरयोच्या आयोजनामुळे वादग्रस्त ठरले असून या धिरयो रोखण्यात पोलीस पूर्णपणे असमर्थ ठरू लागले आहे. मंगळवारी बाणावली येथे समुद्रकिनाऱयाजवळ वीर व रामू या दोन बैलामध्ये धिरयो लावण्यात आल्या. त्यात रामू हा बैल जबर जखमी होण्याचा प्रकार घडला तरी सुद्धा कोलवा पोलिसांनी कोणतीच कारवाई केलेली नाही.
राजकीय आशीर्वादाने धिरयोचे आयोजन होत असल्याने, पोलीस सुद्धा या धिरयोकडे दुर्लक्ष करीत असल्याचे आढळून आले आहे. मंगळवारी संध्याकाळी वीर व रामू या दोन बैलांमध्ये धिरयो होणार असल्याची कल्पना पोलिसांना देखील होती. पण, पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष करणेच पंसत गेले.
रामू कोसळला पण…
वीर व रामू याच्या धिरयोत कोण जिंकणार या बद्दल कमालीची उत्सुकता निर्माण झाली होती. धिरयो ऐन रंगात आल्या असतानाच रामू खाली कोसळला. त्यामुळे वीर त्याला तेथेच सोडून पळून गेला. त्यामुळे वीर च्या समर्थकांनी जिंकल्याचा आनंद देखील साजरा केला. परंतु, काही वेळाने जमीनवर कोसळलेला रामू पुन्हा उठला व वीर ला शोधू लागला. यामुळे सद्या या धिरयोत कोण जिंकला यावरून दोन्ही बैलांच्या मालकांमध्ये वाद सुरू झालेला आहे.
उपलब्ध माहिती प्रमाणे धिरयोत सहभागी होणाऱया रेडय़ांना तसेच बैलांना नशा येण्यासाठी दारू पाजली जाते. त्यामुळे ते जखमी झाले तरी सहसा माघार घेत नाही. मंगळवारी देखील वीर व रामू यांना नशा येण्यासाठी दारू पाजल्याचे सांगितले जात आहे. त्यात रामूला जास्त नशा चढली व तो खाली कोसळला. पण, जेव्हा त्याची नशा कमी झाली तेव्हा तो वीरला शोधू लागला. रामू कोसळल्यानंतर वीरच्या मालकाने धिरयोतील पैजेचे पैसे प्राप्त केले. पण, जेव्हा रामू पुन्हा धिरयोसाठी सज्ज झाला, त्यामुळे वीर जिंकला असे गृहित धरता येत नसल्याने सद्या दोन्ही मालकांमध्ये वाद निर्माण झालेला आहे.
दरम्यान, पीपल्स फॉर ऍनिमल्स तर्फे पोलीस तक्रार करण्यात आली असून कोलवा पोलीस स्थानकाच्या हद्दित धिरयो आयोजित करून मुक्या प्राण्यांना छळण्याचा प्रकार घडत असल्याचे म्हटले आहे. धिरयो आयोजनावर कायद्याने बंदी असली तरी पोलीस कारवाई करीत नसल्याचे नोर्मा आल्वारीस यांनी तक्रारीत नमूद केले आहे.
ही तक्रार कोलवा पोलीस स्थानक, पोलीस महासंचालक तसेच दक्षिण गोवा पोलीस अधीक्षकांना सादर करण्यात आलेली आहे. कोलवा पोलीस स्थानकाच्या हद्दितच धिरयोचे कशा प्रकारे आयोजन होते व पोलीस का कारवाई करीत नाही असा सवाल देखील तक्रारीतून उपस्थित करण्यात आलेला आहे. धिरयो रोखल्या जात नसल्याने न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन होत असल्याचे म्हटले आहे.