अचूक बातमी “तरुण भारत”ची, मंगळवार 23 नोव्हेंबर 2021, स. 11.30
● सोमवारी रात्री अहवालात 17 बाधित
● नवव्या दिवशी वाढ 30 च्या खाली
● एकूण 2,125 जणांची तपासणी
● जिल्ह्यात लसीकरणाचाही वेग वाढला
● हत्ती गेला शेपूट राहिलंय
सातारा / प्रतिनिधी :
नोव्हेंबर महिना जिल्ह्यासाठी मोठा दिलासादायक ठरला. यामध्ये दि. 1 नोव्हेंबरची 50 एवढी बाधित वाढ सोडता नंतर बाधित वाढ 20 ते 30 दरम्यान स्थिर राहिली. एकदा नीचांकी बाधित वाढ अकरा एवढी समोर आली होती. गेल्या नऊ दिवसापासून ते 30 च्या खाली राहिलेली असून गत दोन तीन दिवसात 26, 22 अशी नवीन बाधित वाढ समोर आली आणि सोमवारी रात्रीच्या अहवालात पुन्हा नीचांकी बाधित वाढ नोंद झाली असून फक्त 17 जणांचा अहवाल बाधित आलेला आहे.
वाढीचा आलेख 20 च्या खाली
नोव्हेंबर महिन्याच्या मध्यानंतर बाधित वाढीचा आलेख जिल्ह्यात दिलासादायक घसरलेला आहे. मात्र गेल्या पंधरा दिवसापासून बाधित वाढ 20 ते 30 दरम्यान स्थिर आहे. यामध्ये सलग नवव्या दिवशी बाधित वाढ 30 च्या नजिक राहिली आहे. वाढीचा आलेख कधी वीसनजीक खाली बसून तो पुन्हा कधी तीस नजीक जात वर आहे. यामध्ये सातारा तालुका सोडल्यास सर्व तालुक्यात अनेक वेळा बाधित वाढीचा आलेख शून्यावर राहिलेला आहे.
सोमवारी अहवालात 17 बाधित
प्रशासनाकडून मंगळवारी सकाळी देण्यात आलेल्या सोमवारी रात्रीच्या अहवालात फक्त 17 जणांचा अहवाल बाधित आलेला आहे. यामध्ये एकूण 2,135 जणांची तपासणी करण्यात आलेली असून एकूण पॉझिटिव्हिटी दर 0.87 टक्के एवढा राहिलेला आहे. एकूण आजच्या स्थितीत जावली, महाबळेश्वर, खंडाळा, वाई, कोरेगाव, कराड, माण, खटाव हे तालुके पूर्ण कोरोनामुक्तीच्या मार्गावर आहेत. अधून-मधून सातारा व कराड तालुक्यात होणारी अल्प वाढ फारशी चिंताजनक नाही त्याचा वेग कमी आहे.
जिल्ह्यात लसीकरणाचा वेग वाढला
नोव्हेंबर महिन्यात पुन्हा एकदा लसीकरणाने चांगलीच गती घेतली असून, जिल्ह्यात एकूण 30 लाख 645 जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. ही मोठी दिलासादायक बाब असून यामध्ये पहिला डोस घेतलेल्यांची संख्या 20 लाख 97 एवढी झाली आहे. दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या वाढली असून ती 10 लाख 2हजार 982 एवढी झालेली आहे. दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्याही वाढण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत.
हत्ती गेला शेपूट राहिले…
जवळपास गत दोन वर्षांपासून कोरोना संसर्गाशी संघर्ष करत असलेल्या जिल्ह्याने अनेक वाईट अनुभव घेतले आणि या सर्वातून लढताना प्रशासनाच्या प्रत्येक गोष्टीला सहकार्य देखील केले. आरोग्य विभाग आणि प्रशासनाच्या माध्यमातून आणि सामाजिक संस्थांच्या सहकार्यातून कोरोना विरुद्धची लढाई सुरू होती. आता जिंकण्याच्या आशा निर्माण झालेल्या आहेत. नव्या वर्षाकडे जाताना येणारे वर्ष जिल्ह्याचे कोरोनामुक्तीने स्वागत करेल, अशी आशा निर्माण झालेली आहे.
सोमवारपर्यंत जिल्हय़ात
एकूण नमुने 22,81,660
एकूण बाधित 2,51,867
कोरोनामुक्त 2,44,239
एकूण मृत्यू 6,471
सक्रीय रुग्ण 306
सोमवारी जिल्हय़ात
बाधित 26
मुक्त 17
मृत्यू 00