प्रतिनिधी/ सातारा
जूनच्या आरंभापासून जिल्हय़ातील परिस्थिती आटोक्यात येवू लागली असली तरी अद्याप नियंत्रणात आलेली नाही. बाधित वाढीचा वेग मंदावला असला तरी आता तीन अंकी संख्येने वाढ सुरु असून यामध्ये दोन अंकी संख्येवर आलेले सात तालुके दिलासा देत आहेत. कोरोनामुक्तीचा वेग चांगला असून गेल्या 13 दिवसात 23,975 जणांनी कोरोनावर मात करत लढाईला बळ दिले आहे. जिल्हय़ात बेडसाठी होणारी वणवण थांबली असून प्रत्यक्ष उपचार घेणाऱयांची संख्या 2,078 एवढी खाली आली. त्यामुळे जिल्हय़ात 2,772 एवढे बेड शिल्लक आहेत. यामध्ये 1,923 ऑक्सिजन बेड रिक्त असून पॉझिटिव्हीटीचा दरही 10 टक्क्याच्या खाली घसरत आहे.
दरम्यान, जिह्यात शनिवारी रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 856 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 16 बाधितांचा मृत्यु झाला. रविवारी सायंकाळी 738 जणांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिलीय.
सात तालुके दोन अंकी संख्येवर
जूनच्या आरंभापासून कोरोनाची दाहकता कमी होवू लागली. गेल्या चार ते पाच दिवसात जिल्हय़ातील वेग दिलासादायकरित्या मंदावलाय. मात्र, सातारा, कराड खटाव तालुक्यात अद्याप तीन अंकी संख्येने बाधित समोर येत आहे. मात्र, सात तालुके दोन अंकी संख्येवर आलेत. वेग मंदावलाय मात्र, अल्प वाढ सुरुच असून हॉटस्पॉट ठरलेला फलटण तालुकाही चांगला सावरु लागलाय. अद्याप आता सातारा, कराड, खटाव तालुक्यांना काळजी घ्यावी लागणार आहे.
आता लक्ष आणखी शिथीलता कधी याकडे
गत महिन्यातील आकडेवारीमुळे लॉकडाऊन, कडक लॉकडॉऊन आणि पुन्हा कडक लॉकडाऊन अशा चक्रात अडकलेल्या जिल्हावासियांकडून लॉकडाऊनला विरोध होवू लागला. तोपर्यंत राज्य सरकारचे नवीन निकष आले त्यात निदान अत्यावश्यक सेवा केल्यानंतर नागरिकांना थोडा दिलासा लाभलाय. आता वेग मंदावत असल्याने आणि पॉझिटिव्हीटीचा आलेखही खाली घसरत असल्याने आता आणखी शिथिलता कधी? याची उत्सुकता नागरिकांमध्ये आहे.
जिल्हय़ात 856 नवे बाधित
तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आजअखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढीलप्रमाणे. सातारा 174 (37,827), कराड 166 (24,632), खटाव 151 (18,122), फलटण 73 (27,541), कोरेगांव 60 (15,687), पाटण 58 (7,682), माण 54 (12,339), जावली 41 (8,084), खंडाळा 30 (11,220), वाई 26 (12,124), महाबळेश्वर 13 (4,171), इतर 10 (1,178) असे आजअखेर एकूण 1,80,607 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.
सहा तालुक्यात एकही बळी नाही
आलेल्यात अहवालानुसार 16 बाधितांचा मृत्यू झाला असून यामध्ये सात तालुक्यात एकाही बाधिताचा बळी गेलेला नाही. मात्र मृत्यूसत्र थांबवण्याचे आव्हान आरोग्य विभागासह जिल्हासमोर आहे. मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आज अखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. सातारा 6 (1147), कराड 5 (722), कोरेगांव 3 (357), खटाव 1 (446), पाटण 1 (172), जावली 0 (183), खंडाळा 0 (143), माण 0 (243), महाबळेश्वर 0 (44), फलटण 0 (272), वाई 0 (319) असे आज अखेर जिह्यामध्ये एकूण 4,048 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
गत 13 दिवसात उच्चांकी कोरोनामुक्ती
गेल्या 13 दिवसात दि. 1 ते 13 जून बाधित वाढीचा वेग मंदावत असला तरी एकूण 15 हजार 154 जण बाधित समोर आले. तर कोरोनामुक्तीचा वेग हा उच्चांकी राहिलेला आहे. 24 हजार 237 जण कोरोनामुक्त झालेले आहेत. यामध्ये दि. 2 जून रोजी एकूण सव्वा वर्षातील 5,107 एवढया मोठय़ा उच्चांकी संख्येने नागरिक कोरोनामुक्त झाले. त्यानंतर देखील कोरोनामुक्तीचे आकडे दिलासादायक आहेत. मात्र, गत 13 दिवसात 371 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. मृत्यूदरात अल्प घट आहे मात्र बळी जातच आहेत.
जिल्हय़ात 2,772 बेड रिक्त
आजमितीस जिल्हय़ात कोव्हिड हॉस्पिटल्समध्ये 4,860 एकूण बेड संख्या आहे. यामध्ये प्रत्यक्ष उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 2,088 एवढी असून हॉस्पिटलमध्ये 2,334 बेड रिक्त आहेत. कोव्हिड हॉस्पिटल्समध्ये आयसीयू व्हेंटीलेटरसह 42 बेड, आयसीयू व्हेंटिलेटरविना 173, ऑक्सिजनसह 1,598 बेड आणि ऑक्सिजनविना 521 असे 2,334 बेड रिक्त आहेत.
रविवारी 1,351 जणांना मिळाली लस जिल्हय़ात लसीकरणाचा वेग मंदावलेला आहे. उपलब्ध साठय़ानुसार लसीकरण सुरु असून गत दोन दिवसात हा आकडा अत्यंत अल्प होता. रविवारी फक्त 1,351 जणांना लस देण्यात आली आहे. त्यामुळे पहिला डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या 6 लाख 61 हजार 478 झालीय. तर दुसरा डोस घेतलेल्यांची संख्या 1 लाख 37 हजार 42 झाली असून एकूण लस घेतलेल्यांची संख्या 7 लाख 98 हजार 520 एवढी झालीय