पुरवणी परीक्षा : दोन भरारी पथके नियुक्त : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व दक्षता
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
दहावी व बारावीच्या पुरवणी परीक्षा 10 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर या कालावधीमध्ये होत आहेत. या परीक्षांना जिल्हय़ातील एकूण 293 विद्यार्थी प्रविष्ट होणार आहेत. त्यापैकी 180 विद्यार्थी बारावी परीक्षेस, तर 113 विद्यार्थी दहावीच्या परीक्षेस बसणार आहेत. या परीक्षांसाठी दोन भरारी पथके तयार करण्यात आली आहेत. माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली एक आणि निरंतर शिक्षण शिक्षणाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली एक अशी दोन भरारी पथके असणार आहेत.
या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर दक्षता समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ^झाली. या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर, निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी अशोक कडूस, प्राथमिकचे शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर, सातत्यपूर्ण व्यावसायिक शिक्षणचे डॉ. प्रकाश जाधव, निरंतर शिक्षणचे शिक्षणाधिकारी अनिल तिजारे, परिवहन महामंडळाचे गोसावी, पोलीस अधीक्षक यांचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.
बारावीच्या परीक्षेसाठी सावंतवाडी येथील खेमराज महाविद्यालय व कणकवली येथील एस. एम. महाविद्यालय अशी दोन केंद्रे आहेत. सावंतवाडी येथील केंद्रावर 106 आणि कणकवली येथील केंद्रावर 74 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. तर दहावी परीक्षेसाठी कळसुलकर हायस्कूल, सावंतवाडी आणि एस. एम. हायस्कूल, कणकवली अशी दोन केंद्रे आहेत. सावंतवाडी येथील केंद्रावर दहावीच्या परीक्षेसाठी सत्तर आणि कणकवली येथील परीक्षा केंद्रावर 43 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.
परीक्षा केंद्रावर सॅनिटायझर, थर्मल गन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच एखाद्या विद्यार्थ्यास तापासारखी लक्षणे असल्यास त्याची स्वतंत्र ब्लॉकमध्ये व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांनी दिली. कोविडच्या पार्श्वभूमीवर एका ब्लॉकमध्ये 10 ते 12 विद्यार्थ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. अत्यावश्यक गरजेसाठी वैद्यकीय सेवा उपलब्ध व्हावी, यासाठी आरोग्य यंत्रणेचे सहकार्य घेण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर यांनी यावेळी दिल्या. तर परीक्षा केंद्राच्या परिसरामध्ये कलम 144 लागू करण्याच्याही सूचना यावेळी देण्यात आल्या. पेपरच्या कस्टडीसाठी हत्यारी पोलीस बंदोबस्त तैनात करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. महामंडळाने गाडय़ांचे नियोजन केले असून वेळेत गाडय़ा सोडण्यात येतील, असे महामंडळाच्या प्रतिनिधींनी बैठकीत सांगितले.