नवीन बंधारा वर्षभरातच कोसळला
तरुण भारत संवाद प्रतिनिधी / बार्शी
लघुपाटबंधारे विभाग बार्शी यांच्या वतीने शहराच्या जवळून वाहणारा घोर ओढा आहे. त्यावर बांधलेले बंधारे निकृष्ट असल्याचे पुन्हा सिद्ध झाले आहे. या कामात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होऊन काम निकृष्ट झाल्याची तक्रार माहिती अधिकार कार्यकर्ते दिनानाथ काटकर यांनी मागीलवर्षी दिली होती.
गतवर्षी पाऊस चांगला झाला परंतु बंधाऱ्याच्या कडेची माती वाहून गेली, पाणी साठलेच नाही. यावर्षी तर मान्सून येण्याआधीच एक बंधारा मधूनच तुटला. या ओढ्यातील बांधलेले बंधारे त्याचे अंदाज पत्रक कोणी केले, त्याची पाहणी कोणी केली, तो बांधला कोणी, तक्रार देऊनही ज्या वरिष्ठांनी दुर्लक्ष केले अशा सर्वांवरती तात्काळ गुन्हे दाखल झाले पाहिजेत अशी मागणी काटकर यांनी केली आहे.
या निकृष्ट बांधकामामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. तसेच जनतेचे लाखो रुपये या भ्रष्टाचारी लोकांमुळे वाया गेले आहेत. संबंधित अभियंते भ्रष्टाचाराचे कुरण खात असून जनतेची आणि शेतकऱ्यांची फसवणूक करीत असल्याचे दिसत आहे.