तरुण भारत संवाद प्रतिनिधी / बार्शी
मतदारांनो तुम्ही माझ्या हाती सत्ता द्या मी बार्शी शहराचा सर्वांगिण विकास करतो अशी भावनिक साद घालून सत्तेवर विराजमान झालेल्या लोकप्रतिनिधींनी वचनपूर्ती करण्यासाठी शहराच्या विकासाची कामे सुरु केली. त्या विकास कामांतर्गत अनेका राजकिय कुरघोड्या करून पदरात पाडून घेतलेल्या भुयारी गटार योजनेचे काम सुरू करताना शहरातले सर्व रस्ते उखडले गेले, पाईप टाकले गेले, चेम्बर तयार करताना अनेकांचे नळ कनेक्शन तोडले गेले. विकासाचे काम सुरू असताना सर्वत्र नुसते खड्डे, धूळ यांचे साम्राज्य होते. परंतु शहराचा विकास होतो आहे ही जाणिव मनात ठेवून नागरिकांनी ते खड्डे आणि धूळ सहन केली. परंतु आज वर्षाचा कालावधी लोटला तरी ही योजना म्हणावी तितकी कागदावरून खाली उतरलीच नाही याचा अनुभव आपण नागरिकांनी पावसाळ्यात घेतला. पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली.
अनेक ठिकाणचे चेम्बर फुटले, अनेकांच्या घरात मैला मिश्रीत पाणी शिरले, रोगराई वाढली. याबाबतीत अनेक पक्षीय संघटनांनी आवाज उठवला पण सत्ताधाऱ्यांनी याकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष केले. रस्त्याच्या मागणीबरोबरच शहराला नियमित, वेळेवर आणि योग्य दाबाने पाणी पुरवठा व्हावा या मागणीनेही जोर धरला मुख्याधिकारी, लोकप्रतिनिधी, नगराध्यक्ष, पाणी अभियंता, नगरसेवक यांना निवेदने दिली गेली पण त्या निवेदनांना केराची टोपली दाखवली गेली. अनेकदा तर याबाबतीत विसंगत आणि उडवाउडवीची उत्तरे संबंधीत अधिकाऱ्यानी दिली. एक दिवसाआड पाणी पुरवठा करु अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या. परंतु नव्या नवरी प्रमाणे जेमतेम एक आठवडाच याची काटेकोर अंमलबजावणी झाली आणि पुढे “पहिले पाढे पंच्चावन” अशी गत झाली आहे.
नगरपालिका आर्थिक संकटात आहे असे वारंवार सांगितले जाते. असे असताना नागरिकांनी आजपर्यंत जो कर भरला आहे त्या कराचे काय ? जमा झालेल्या करातुनच नागरी सोयीसुविधा उपलब्ध करुन दिले जाणे गरजेचे आहे. परंतु, तुम्ही फक्त कर भरत रहा आम्ही सोयीसुविधा आमच्या सोयीने करु असा आविर्भाव संबंधित अधिकाऱ्यांचा आहे. पण असे हे चालणार कुठपर्यंत ? असा प्रश्न प्रत्येक सुज्ञ नागरिक विचारतो आहे.
शहर सुधारणा करत असताना गैरसोयी होतात हे मान्य आहे परंतु या अधिकाऱ्यांनी आज पर्यंत केलेल्या विधानांवरून असे दिसते की त्यांनी हेतुपुरस्कर जनतेला वेठीस धरले आहे. शहरासाठी जनतेसाठी जर आपण मुलभूत सोयी देवू शकत नसाल तर हे शहर चंद्र अथवा मंगळ ग्रहावर स्थलांतरित करण्याचा ऐतिहासिक निर्णय घ्यावा अशा आशयाची मागणी करणारे पत्र बार्शी शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने उपाध्यक्ष निलेश मांजरे- पाटील, निवेदिता आरगडे, निखिल म्हस्के आणि पदाधिकारी यांनी नगरपालिका मुख्याधिकारी यांना दिले आहे.