प्रतिनिधी/ बेळगाव
ज्याकाळी हिंदुत्वावर सहसा कोणी भाष्य करण्यास तयार नव्हते, त्यावेळी बाळासाहेबांनी हिंदुत्व संपूर्ण देशाला दाखवून दिले. अखंड महाराष्ट्रासाठीचे त्यांचे प्रयत्न हे इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिले गेले आहेत. भगव्या ध्वजाखाली एक व्हा, अशी साद त्यांनी घातली होती. परंतु आज भगव्या ध्वजावरूनच राजकारण केले जात आहे. ज्यांना त्याविषयी तसूभरही माहिती नाही, असे भगव्यावरून राजकारण करू पाहत आहेत. तर अनेकांना भगव्याची कावीळ आहे. आज बाळासाहेब असते तर हे प्रकार त्यांनी खपवून घेतले नसते, असे विचार शिवप्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष किरण गावडे यांनी मांडले.
शिवप्रति÷ान हिंदुस्थानतर्फे शनिवारी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे मुंबईला मराठीपण राहिले. मराठी माणसाला मानाने जगता आल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी तालुका प्रमुख परशुराम कोकितकर, शहर कार्यवाहक विश्वनाथ पाटील, विभाग प्रमुख कल्लाप्पा पाटील, अनंत चौगुले, किरण बडवाण्णाचे, अंकुश केसरकर, गजानन पवार, प्रमोद चौगुले, राजू कदम, विनायक उसुलकर उपस्थित होते.