पाकची नवी आगळीक- शिखांच्या भावनेच्या विरोधात उचलले पाऊल
वृत्तसंस्था/ कोलकाता
पश्चिम बंगालमध्ये पोहोचलेले केंद्रीय गृहमंत्री तसेच भाजपचे नेते अमित शाह यांनी गुरुवारी बांकुडा येथील सभेला संबोधित केले आहे. राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालीच परिवर्तन शक्य आहे. तसेच राज्यात तीन-चतुर्थांश बहुमतासह भाजपचे सरकार सत्तेवर येणार असल्याचा दावा शाह यांनी केला आहे.
तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा तसेच मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विरोधात प्रचंड जनाक्रोश दिसून येत आहे. त्यांच्या जनविरोधी धोरणांचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. तर दुसरीकडे पंतप्रधान मोदींकडून जनतेला अनेक अपेक्षा आहेत. ममता बॅनर्जी केंद्राच्या योजना गरिबांपर्यंत पोहोचू देत नाहीत. भाजपला लाभ होणार या भीतीने ममतादीदी योजना लागू करत नाहीत, परंतु यामुळे भाजपला रोखता येणार नाही. बंगालच्या जनतेने ममता बॅनर्जींच्या सरकारला पायउतार करण्याचा निश्चय केल्याचे शाह यांनी म्हटले आहे.
गरीब आणि तरुणाईचा अधिकार हिरावणाऱया तृणमूलच्या भ्रष्ट आणि अत्याचारी सरकारला हाकला असे आवाहन जनतेला करत शाह यांनी भाजपचे सरकार आल्यास राज्यात चहुबाजूने विकास होणार असल्याचा दावा केला आहे. न्यायालयीन कोठडीत मृत्युमुखी पडलेल्या भाजप कार्यकर्त्याच्या कुटुंबीयांची शाह यांनी बुधवारी रात्री भेट घेतली आहे.
पूर्व मेदिनीपूर जिल्हय़ाच्या पताशपूरमध्ये मदन घोराईला अपहरणाप्रकरणी 26 सप्टेंबर रोजी ताब्यात घेण्यात आले होते. तर 13 ऑक्टोबर रोजी त्याचा मृत्यू झाला होता. भाजप प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष आणि अन्य नेत्यांसह शाह यांनी घोराई यांच्या कुटुंबीयांची कोलकाता विमानतळावर भेट घेतली आहे. घोराई कुटुंबीयांना धमक्या मिळत असल्याचे भाजप नेत्यांनी म्हटले आहे.