नवी दिल्ली / वृत्तसंस्था
बिहारमध्ये भाजपने संयुक्त जनता दलाशी युती केलेली आहे. ही युती अतूट असून पुन्हा आमचेच सरकार येणार असल्याचा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला आहे. तसेच जागावाटपामध्ये भाजपच्या पारडय़ात अधिक जागा आल्या असल्या तरी विद्यमान मुख्यमंत्री नितीशकुमार हेच भाजप-संजद युतीचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार असतील, अशी स्पष्टोक्तीही त्यांनी दिली आहे.
महाराष्ट्रात एकत्र निवडणूक लढवल्यानंतरही शिवसेना मुख्यमंत्रिपदासाठी फिफ्टी-फिफ्टीच्या फॉर्म्युल्यावर अडून राहिल्याने भाजपचे सत्तेचे स्वप्न भंगले होते. याची पुनरावृत्ती बिहारमध्ये होऊ नये म्हणून भाजपने विशेष काळजी घेतली आहे. त्यामुळेच बिहारमध्ये निकालानंतर नितीशकुमार हेच मुख्यमंत्रिपदी कायम राहतील, असे गृहमंत्री अमित शहा यांनी एका मुलाखतीमध्ये स्पष्ट केले आहे.
राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) बिहार विधानसभा निवडणुकीत दोन-तृतीयांश बहुमत मिळेल. मुख्यमंत्रिपदासाठी या ठिकाणी ‘जर-तर’ असणार नाही. बिहारमध्ये नितीशकुमार हेच पुढील मुख्यमंत्री असतील. एनडीएमधील कोणत्याही पक्षाला कमी-अधिक जागा मिळाल्या तरी नितीशकुमार हेच एनडीएचे पक्षनेते असतील, असे शहा म्हणाले.