रस्ते शोधत रूग्ण व नातेवाईकांची शहरभर भटकंती
वार्ताहर / कराड
लॉकडाऊनची कडक आंमलबाजवणी व्हावी व विनाकारण फिरणाऱयांना चाप बसावा, यासाठी शहर पोलिसांनी शहरातील प्रमुख रस्त्यांसह अनेक अंतर्गत रस्त्यांवरही बॅरिगेटींग केले आहे. मात्र त्याचा अतिरेक झाल्यामुळे शहरासह ग्रामीण भागातून येणाऱया रूग्ण, नातेवाईक व अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱयांना रस्ता शोधत शहरभर फिरावे लागत आहे. इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी लोकांना बॅरिगेटींगचा भुलभुलैय्या पार करावा लागत आहे.
15 एप्रिलपासुन राज्य शासनाने सुरू केलेल्या अंशतः लॉकडाऊननंतरही सातारा जिल्हय़ातील कोरोनाचा प्रसार वाढतच असल्याने तीन दिवसांपूर्वी जिल्हा प्रशासनाने सातारा जिल्हय़ात कडक लॉकडाऊनची घोषणा केली. त्यानुसार संपूर्ण जिल्हय़ातील दवाखाने व मेडिकलवगळता सर्व अत्यावश्यक सेवेतील दुकानेही बंद ठेवण्यात आली आहेत.
लॉकडाऊनची कडक अंमलबाजावणी व्हावी, यासाठी शहर पोलिसांनी कंबर कसली आहे. कोल्हापूर नाका, कृष्णा सर्कल व भेदा चौकातून शहरात येणाऱया प्रत्येक वाहनाची कसून चौकशी करण्यात येत आहे. तर शहरातील चौकाचौकात पोलीस बंदोबस्त असून रस्त्यावर फिरणाऱयांची चौकशी होत आहे. चौकशीदरम्यान संबंधितास कारण देता आले नाही तर त्यांचे वाहन जप्त करण्याची कारवाई होत आहे. याबरोबरच विनाकरण फिरणाऱयांना चाप बसावा, यासाठी शहर पोलिसांनी शहरातील सर्वच प्रमुख रस्त्यांसह अनेक अंतर्गत रस्त्यांवर बॅरिगेटींग केले आहे. मात्र याचा रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांना होत आहे.
शहरातील विविध रूग्णालय, कोविड सेंटर व घरी राहून उपचार घेणाऱया रूग्णांना एचआरसीटी अथवा अन्य तपासण्या करण्यासाठी शहरात यावे लागत आहे. याशिवाय अन्य रूग्णांनाही नियमित तपासण्यासाठी शहरातील दवाखान्यात व लॅबमध्ये यावे लागत आहे. अशा रूग्ण व नातेवाईकांना रस्ते बंद असल्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. पोलिसांनी कोल्हापूर नाका ते कृष्णा नाका, दत्त चौक, बसस्थानक परिसर यासाह मुख्य बाजारपेठेकडे जाणाऱया रस्त्यांवर मोठया प्रमाणात बॅरिगेटींग केले आहे. यामुळे ग्रामीण भागातील रूग्णांना इच्छित स्थळी पोहोचताना कसरत करावी लागत आहे. शहरातील रूग्णांनाही वाट सपडत नसल्याने शहरभर भटकावे लागत आहे.
प्रशासनाचे लॉकडाऊन…. पोलिसांचा रस्ता रोको
कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कडक लॉकडाऊन केला आहे. मात्र शहर पोलिसांनी सर्व रस्त्यावर बॅरिगेटींग करून रस्ते बंद केले आहेत. पोलिसांनी याचा अतिरेक न करता विनाकारण फिरणाऱयांना चाप लावण्याचा उद्देश साधावा. बॅरिगेटींगच्या अतिरेकाचा सर्वाधिक त्रास रूग्णांना होत आहे.