निर्णयापासून परावृत्त करू नये म्हणून घेतला निर्णय
कोल्हापूर प्रतिनिधी
मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांची अंमलबजावणी करण्यासाठी मी आमरण उपोषणाचा निर्णय घेतला होता. मात्र हा निर्णय घेत असताना माझ्या कुटुंबातील कोणाला याबाबत कोणतीही कल्पना दिली नव्हती; कारण, घेतलेल्या निर्णयापासून मला परावृत्त करण्यासाठी सर्वांचे प्रयत्न झाले असते, अशा शब्दात खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आपल्या आंदोलनाच्या निर्णयापूर्वीचे गुपित उघड केले आहे.
या संदर्भात सोशल मीडियावर दिलेल्या माहिती संभाजीराजे यांनी म्हटले आहे की माझ्यासाठी हा कठीण काळ होता. लोकशाहीमध्ये मिळालेल्या घटनात्मक कक्षेत राहुन समाजावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध हा लढा देण्याचा निर्धार माझ्या मनात पक्का होता. छत्रपती घराण्याची परंपराच कठीण काळात निर्भयपणे व आत्मविश्वासपुर्ण सामोरे जाण्याची असल्याने घराण्याची पुण्याई माझ्या कामी आली. आणि या लढाईला धीरोदात्तपणे सामोरा गेलो. तुम्हा सर्वांच्या सद्भावना, पत्नी संयोगीताराजे छत्रपती, चिरंजीव शहाजीराजे यांची खंबीर साथ, वडील करवीरअधिपती शाहू छत्रपती महाराज, आईसाहेब याज्ञसेनी महाराज यांचे आशीर्वाद, शककर्ते श्री छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची पुण्याई मला लाभली. माझ्या प्रकृतीची काळजी घेत मराठा समाजाच्या प्रतिनिधींनी दाखवलेली समयसूचकता, प्रिंटमीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया यांच्या प्रतिनिधींनी या उपोषणाच महत्व जाणून दिलेले कव्हरेज, तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्हा सर्वांनी केलेला उठाव हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी कारणीभूत आहेत. आपल्या सर्वांचे प्रेम आणि सदभावना वृध्दिंगत राहो, जेणेकरून मला या महाराष्ट्राची, देशाची अधिकाधिक सेवा करण्याची उर्जा मिळेल अशा भावना व्यक्त केल्या.