महाराष्ट्र सीमेवरील जिल्हय़ांना दिलासा
केरळ व महाराष्ट्र राज्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठय़ा प्रमाणात वाढल्यामुळे या दोन्ही राज्यातून कर्नाटकात येणाऱयांवर करडी नजर ठेवण्यात येत आहे. दरम्यान, खबरदारी म्हणून या राज्यांच्या सीमेवरील 8 जिल्हय़ांमध्ये विकेंड कर्फ्यू जारी करण्यात आला होता. आता महाराष्ट्र सीमेलगतच्या बेळगावसह चार जिल्हय़ांमधील विकेंड कर्फ्यू मागे घेण्यात आला आहे. तर केरळ सीमेलगतच्या उडुपी, मंगळूर, कोडगू तसेच हासन या चार जिल्हय़ांमधील विकेंड कर्फ्यू कायम ठेवण्यात आला आहे. तथापि, राज्यभरात दररोज रात्री 9 ते पहाटे 5 पर्यंतच्या कालावधीत पूर्वीप्रमाणेच नाईट कर्फ्यू असणार आहे. मात्र नाईट कर्फ्यू कालावधीत अत्यावश्यक सेवा, मालवाहतूक, रात्रपाळीवरील कंपन्या सुरू ठेवण्यात मुभा असणार आहे. विकेंड कर्फ्यू व नाईट कर्फ्यूसंबंधीची नवी नियमावली 13 सप्टेंबर रोजी सकाळी 6 पर्यंत जारी असणार आहे.
मंगल कार्यालयांमध्ये विवाह समारंभ व इतर कार्यक्रमांचे आयोजन करण्यास परवानगी देण्यात आली आहे. कमाल 400 जणांच्या उपस्थितीची मर्यादा घालण्यात आली आहे. मंगल कार्यालय क्षमतेच्या 50 टक्के जणांनाच विवाह समारंभ, सभा, कार्यक्रमांसाठी उपस्थित राहता येणार आहे.
केरळमधून येणाऱयांना संस्थात्मक क्वारंटाईन
देशभरात दिवसात आढळून येणाऱया नव्या कोरोना रुग्णांपैकी 75 टक्क्यांहून अधिक रुग्ण हे केरळमधील आहेत. त्यामुळे खबरदारी म्हणून या राज्यातून कर्नाटकात येणाऱयांना आठवडाभर संस्थात्मक क्वारंटाईन सक्तीचे करण्याचा निर्णयही सोमवारच्या कोविड तांत्रिक सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला. याआधी केरळमधून कर्नाटकात येणाऱयांना कोरोना प्रतिबंधक लस घेतलेली असली तर 72 तासांपूर्वी केलेल्या आरटी-पीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल सादर करणे बंधनकारक होते.