बेळगाव /प्रतिनिधी
बेळगाव विभागातून आंतरराज्य बससेवा सुरळीत सुरू झाली असून बेळगाव बसस्थानकातून दररोज महाराष्ट्राच्या विविध जिल्हय़ात कर्नाटक परिवहनच्या 49 हून अधिक बसेस धावत आहेत. त्यामुळे बेळगाव विभागाचे उत्पन्न हळूहळू वाढत आहे. त्यामुळे परिवहनची आर्थिक चाके पूर्ववत होताना दिसत आहेत.
साधारण पाच महिन्यांहून अधिक काळ बंद असलेली कर्नाटक-महाराष्ट्र बससेवा 22 सप्टेंबरपासून सुरू झाली. सुरुवातीच्या काळात बेळगाव आगारातून केवळ कोल्हापूरपुरती मर्यादित बससेवा सुरू करण्यास महाराष्ट्र एसटी महामंडळाने परवानगी दिली होती. मात्र, आता महाराष्ट्राच्या विविध जिल्हय़ात कर्नाटक परिवहनच्या बसेस धावत आहेत. बेळगाव विभागातून दररोज महाराष्ट्रातील कोल्हापूर, पुणे, नाशिक, पंढरपूर, सोलापूर, तुळजापूर आदी शहरांकडे बसेस धावत आहेत.
कोरोना काळात बंद असलेली बससेवा आणि त्यानंतर प्रवाशांचा मिळालेला अल्प प्रतिसाद यामुळे बेळगाव विभागाला तब्बल 110 कोटींचा फटका बसला. त्यामुळे परिवहन आर्थिकदृष्टय़ा दुर्बल झाले आहे. कोरोना काळात झालेले नुकसान भरून काढण्यासाठी परिवहनचे कसोशीने प्रयत्न सुरू आहेत. प्रवाशांच्या संख्येनुसार बसफेऱया वाढवून उत्पन्न वाढविण्यावर भर दिला जात असला तरी अद्याप महाराष्ट्र व इतर ठिकाणी धावणाऱया बसेसना म्हणावा तितका प्रवाशांचा प्रतिसाद दिसून येत नाही. अनलॉक चारमध्ये उत्पन्नाच्या दृष्टिकोनातून आंतरजिल्हा व आंतरराज्य बससेवा सुरू करण्यात आली. मात्र कोरोनामुळे धास्तावलेली जनता अधिक प्रमाणात बाहेर फिरताना दिसत नाही. त्यामुळे परिवहनचे उत्पन्न हळूहळू वाढताना दिसत आहे. नुकताच बसस्थानकातून वातानुकूलित बससेवेला प्रारंभ झाला असून लांब पल्ल्याचा प्रवास करण्यासाठी ही बससेवा उपयुक्त ठरत आहे. एकूण येत्या काळात परिवहनचे उत्पन्न वाढेल या आशेने सर्व प्रकारच्या बस सुरळीत सुरू करण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्रात धावणाऱया बसच्या माध्यमातून बेळगाव विभागाला 40 टक्के उत्पन्न मिळते. मात्र सध्या महाराष्ट्रात धावणाऱया परिवहनच्या बसना अल्पसा प्रतिसाद दिसून येत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात धावणाऱया बसमध्ये प्रवाशांची संख्या वाढल्यास परिवहनचे उत्पन्न पूर्ववत होण्यास मदत होणार आहे.