राज्यातील इतर 8 जिल्हय़ांचाही समावेश : वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांची विधानसभेत माहिती :
नियमांचे उल्लंघन करण्यांवर कारवाईचा इशारा
प्रतिनिधी/ बेंगळूर
कोरोना नियंत्रणासाठी बेळगावसह 9 जिल्हय़ांमध्ये 31 मार्चपर्यंत संचारबंदीच्या धर्तीवर लॉकडाऊन करण्यात येत असल्याची घोषणा वैद्यकीय शिक्षण मंत्री डॉ, के. सुधाकर यांनी विधानसभेमध्ये केली आहे. राज्याच्या सर्व सीमा बंद करण्यात येत असून केएसआरटीसी, बीएमटीसीच्या सर्व बसेस पूर्णपणे बंद ठेवण्यात येत आहेत. त्यामुळे रविवारप्रमाणेच सर्व दैनंदिन व्यवहार ठप्प होणार आहेत.
दूध, खाद्यपदार्थ, भाजीपाला वगळता कोणत्याही वस्तू उपलब्ध होणार नाहीत. मंगळूर, बेळगाव, बेंगळूर शहर, बेंगळूर ग्रामीण, धारवाड, गुलबर्गा, चिक्कबळ्ळापूर, कोडगू या जिल्हय़ांमध्ये संचारबंदीच्या लॉकडाऊन करण्यात येणार आहे. या जिल्हय़ांमध्ये सरकारी कार्यालये, अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दैनंदिन व्यवहार बंद राहणार आहेत. या कालावधीत नियमांचे उल्लंघन करणाऱयांविरुद्ध कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
संपूर्ण राज्य लॉकडाऊनचा निर्णय : अद्याप अधिकृत घोषणा नाही
रविवारी एकाच दिवशी राज्यात कोरोनाचे 6 रुग्ण आढळून आले होते. शिवाय सोमवारी सकाळी सतर्कतेच्या सूचना देऊन सुद्धा लोक रस्त्यावर मोठय़ा प्रमाणात दिसून आल्याने मुख्यमंत्र्यांनी राज्याचे मुख्य सचिव, आरोग्य खात्याचे आयुक्त, विरोधी पक्षातील नेते व इतर वरिष्ठ अधिकाऱयांची तातडीची बैठक घेतली. यावेळी अनेक जणांनी मुख्यमंत्र्यांना कोरोना नियंत्रणासाठी संपूर्ण राज्य लॉकडाऊन करणे एकमेव पर्याय असल्याचा सल्ला दिला. मात्र याबाबत सायंकाळपर्यंत अधिकृत घोषणा करण्यात आली नाही.
मुख्यमंत्र्यांनी सोमवारी सकाळी जनतेला सरकारने सुचविलेल्या मार्गसूचीचे पालन करण्याचे आवाहन जनतेला केले आहे. अत्यावश्यक सेवा असणाऱया आरोग्य, पोलीस, रुग्णालय, वीज, पाणीपुरवठा, अग्निशमन सेवा वगळता सर्व सेवा स्थगित करण्यात येणार आहेत. शिवाय दूध, औषधे, फळे, भाज्या व जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी वेळ निश्चित करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
केएसआरटीसीकडून 50 टक्के कर्मचाऱयांना सुटी
जीवघेण्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक राज्य परिवहन मंडळाने (केएसआरटीसी) आपल्या 50 टक्के कर्मचाऱयांना सुटी दिली आहे. केएसआरटीसीचे व्यवस्थापकीय संचालक शिवयोगी कळसद यांनी माहिती दिली आहे. तातडीच्या सेवांमध्ये कोणत्याही प्रकारची बाधा येऊ नये यासाठी 31 मार्चपर्यंत 50 टक्के कर्मचाऱयांना सुटी देण्यात आली आहे.
कंपनी, कारखाने बंदची एफकेसीसीआयची सूचना
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व कारखाने, गारमेंट कंपन्या बंद करण्याची सूचना एफकेसीसीआयचे अध्यक्ष जनार्दन यांनी दिली आहे. सोमवारी पत्रकार परिषदेत ते बोलत होते. बंद काळात कारखाने, कंपन्यांमधील कर्मचाऱयांचे वेतन कंपनीच्या मालकांनीच द्यावे. एखाद्या वेळेस कारखाना, कंपन्या सुरू ठेवल्यास परवानाच रद्द करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
50 वर्षावरील राज्य सरकारी कर्मचाऱयांना 4 एप्रिलपर्यंत सुटी
खबरदारी उपाययोजना म्हणून राज्यातील 50 वर्षावरील राज्य सरकारी कर्मचाऱयांना सुटी घोषित करण्यात आली आहे. 4 एप्रिलपर्यंत 50 वर्षांवरीस सरकारी कर्मचाऱयांना हा आदेश लागू राहणार आहे. सरकारचे उपसचिव चंद्रहास ताळूकर यांनी याबाबतचा आदेश जारी केली आला आहे. कोरोना नियंत्रणासाठी केंद्र सरकारने राज्य सरकारना सूचना दिल्या आहेत. त्यानुसार 50 वर्षावरील आणि मधूमेह, श्वसनाचा त्रास असणारे, मूत्रपिंडाचा आजार यासह गंभीर आजार असणाऱया राज्य सरकारी कर्मचाऱयांना सुटी देण्यात आली आहे. याकरिता त्यांना कोणत्याही प्रकारचे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करावे लागणार नाही, असे आदेशपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
मशिदींमध्येही प्रार्थनेवर निर्बंध
राज्यात कोरोना नियंत्रणासाठी अनेक उपाययोजना हाती घेण्यात येत आहे. मशिदींमध्ये होणारी गर्दी कमी करण्यासाठी दररोज आणि शुक्रवारच्या प्रार्थनेवर 31 मार्चपर्यंत निर्बंध घालण्यात आले आहेत. सोमवारी अल्पसंख्याक कल्याण आणि वक्फ बोर्ड खात्याचे सचिव ए. बी. इब्राहिम यांनी याबाबतचा आदेश दिला आहे. सौदी अरेबियाशह अनेक मुस्लीमबहुल राष्ट्रांमध्ये मशिदींमध्ये प्रार्थनेवर निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यानुसार कर्नाटकातही खबरदारी म्हणून हा निर्णय घेण्यात आले आहे, असे त्यांनी आदेशात नमूद केले आहे.
क्वारंटाइनचे उल्लंघन केल्यास 6 महिने कारावास
काही जण होम क्वारंटाइनचे उल्लंघन करीत आहेत. विमानतळावर आरोग्य तपासणीवेळी शिक्का मारला तरी घरातच निरीक्षणाखाली न राहता क्वारंटाइनच्या नियमांचे उल्लंघन करून काही जण घराबाहेर वावरत आहेत. ही बाब भा. दं. वि. 271 चे उल्लंघन ठरते. त्यामुळे संबंधिताला अटक करून सहा महिन्यांची शिक्षा ठोठावण्यात येईल. क्वारंटाइन असलेल्यांना आणि त्यांच्या भोवतालच्यांना घराबाहेर न येण्यासंबंधी दरवाजाला नोटीस लावण्यात नोटीस लावण्यात येईल, अशी माहिती गृहमंत्री बसवराज बोम्माई यांनी दिली. बेंगळूरमध्ये वरिष्ठ पोलीस अधिकाऱयांच्या बैठकीनंतर ते बोलत होते. 31 मार्चपर्यंत राज्यातील 9 जिल्हय़ांमध्ये जमावबंदी जारी आहे. दुकाने, वाणिज्य व्यवहार सुरू न ठेवण्याची सूचना देण्यात आली आहे. कैद्यांच्या भेटीवरही निर्बंध घालण्यात आले आहेत. कारागृहांमध्ये कैदी दररोज 5 हजार मास्क तयार करत आहेत. त्यांनी गृहखात्याला आतापर्यंत 17 हजार मास्क तयार करून दिले आहेत. आणखी 40 ते 50 हजार मास्कची आवश्यकता आहे, असे ते म्हणाले.