प्रतिनिधी/ बेळगाव
प्रवाशांच्या मागणीनुसार बेंगळुर ते बेळगाव व बेळगाव ते बेंगळूर या मार्गावर रात्रीची रेल्वे सुरू करण्यात आली. ही रेल्वे सुरू होऊन आठवडा उलटला तरी अद्याप या रेल्वेला म्हणावा तितका प्रवाशांचा प्रतिसाद अद्याप मिळालेला नाही. आतापर्यंत या रेल्वेला केवळ 29 टक्केच प्रवाशांनी प्रतिसाद दिल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. त्यामुळे कोरोनाच्या धास्तीने प्रवासी रेल्वे प्रवास टाळत आहेत.
लॉकडाऊनचे नियम शिथील केल्यानंतर मे महिन्यापासून बेळगाव- बेंगळूर या मार्गावर त्रि साप्ताहिक दिवसा धावणारी रेल्वे सुरू करण्यात आली. कोरोनाची धास्ती असल्यामुळे ही पूर्ण रेल्वे खुर्च्यांची होती. या रेल्वेला तितकासा प्रतिसाद मिळाला नाही. अखेर जून महिन्याच्या अखेरीपासून दररोज रात्रीची धावणारी स्पेशल एक्स्प्रेस सुरू करण्याचा निर्णय नैऋत्य रेल्वेने घेतला.
26 जून पासून ही रेल्वे रात्री 9 वा. बेळगाव येथून निघून सकाळी 7.25 वा. बेंगळूर येथे पोहोचते. याच वेळेला बेंगळूर येथून सुटून बेळगावला पोहोचते. यामध्ये फस्ट एसी, सेकंड एसी, स्लिपर, व चेअर या सर्वांचा समावेश आहे. या रेल्वेला आतापर्यंत 29 टक्के प्रवाशांनी प्रतिसाद दिला आहे.
1426 प्रवासी क्षमता असणाऱया या रेल्वेमध्ये सरासरी दररोज 146 ते 150 प्रवासी प्रवास करत आहेत. 30 जून रोजी सर्वाधिक म्हणजे 200 प्रवाशांनी बेळगाव ते बेंगळूर असा प्रवास केला होता. कोरोनाची धास्ती असल्यामुळे अद्याप प्रवासी रेल्वे प्रवास करण्यास टाळत आहेत, असे बेंगळूर विभागाचे वरि÷ विभागिय व्यवसायिक व्यवस्थापक ए. एन. कृष्णरेड्डी यांनी सांगितले आहे.