बीजिंग/ वृत्तसंस्था
चीनने भारताला त्रास देण्यासाठी नवी घोषणा केली आहे. तिबेटमध्ये ब्रह्मपुत्रा नदीवर धरण निर्माण करून ऊर्जानिर्मिती करणार असल्याचे चीनने म्हटले आहे. धरणामुळे चीन कधीही नदीचा प्रवाह नियंत्रित करू शकतो.
हे धरण अस्तित्वात आल्यावर भारत, बांगलादेशासह अनेक शेजारी देशांना दुष्काळ आणि पूर या दोन्ही संकटांना सामोरे जावे लागू शकते. चीन स्वतःच्या मर्जीनुसार धरणाद्वारे पाणी रोखू शकतो तसेच धरणाचे दरवाजे खुले करू शकतो. धरणाचे दरवाजे उघडल्यास पाण्याचा प्रवाह वेगाने भारतातील ईशान्येच्या राज्यांच्या दिशेने येऊन अरुणाचल प्रदेश, आसामसमवेत अनेक राज्यांमध्ये पूरसंकट निर्माण होऊ शकते. या नदीच्या माध्यमातून ईशान्येतील राज्यांना पाण्याचा पुरवठा होता. चीनच्या धरणाच्या प्रकल्पामुळे भारत आणि बांगलादेश दोघांच्याही चिंता वाढल्या आहेत. 2008 साली भारत आणि चीनने सतलज आणि ब्रह्मपुत्रा नदीच्या पाण्याचा परस्पर सहमतीने वापर करण्यासंबंधी करार केला होता. परंतु 2017 मध्ये डोकलाम वादानंतर चीनने ब्रह्मपुत्रा नदीचा हायड्रोलॉजिकल डाटा देण्यास नकार दिला होता. चीनच्या या विश्वासघातामुळे आसाममध्ये भीषण पूर आला होता.