प्रतिनिधी / कोल्हापूर
ब्राह्मण समाजाच्या आर्थिक विकास महामंडळाबाबत आपण राज्य सरकारला सकारात्मक निर्देश देवू, अशी ग्वाही राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी समस्त ब्राह्मण समाजाच्या शिष्टमंडळाला दिली.
समस्त ब्राह्मण समाजाच्या शिष्टमंडळाने शनिवारी मुंबईतील राजभवनात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी याची भेट घेवून विविध मागण्या मांडल्या. तसेच विविध मुद्द्यांवर चर्चा केली. समस्त ब्राह्मण समाजाचे समन्वयक प्रा. काकासाहेब कुलकर्णी यांनी ब्राह्मण समाजासाठी आर्थिक विकास महामंडळाच्या स्थापनेची मागणी केली. तसेच समाजबांधवांच्या व्यथा मांडल्या. ब्रम्ह महाशिखर परिषदेचे प्रवक्ते विश्वजित देशपांडे यांनी ब्राह्मण समाजाची महाराष्ट्रातील लोकसंख्या व त्यांच्या ग्रामीण भागातील अडचणी राज्यपाल कोश्यारी यांच्यापुढे मांडल्या.
मकरंद कुलकर्णी यांनी राज्यसरकारशी आतापर्यंत झालेला पत्रव्यवहार व सद्यःस्थिती बाबतची माहिती दिली. संजीवनी पांडे यानी ब्राह्मण समाजातील महिला त्यांची आर्थिक व शैक्षणिक स्थिती आणि अडचणी विषद केल्या. ऍड. आरती सदावर्ते – पुरंदरे यांनी ब्राह्मण समहजावर होणाऱ्या लिखाणावर बंदी घालावी व ब्राह्मण समाजाच्या संरक्षणासाठी कडक कायदे करावेत, अशी विनंती केली. यावेळी राज्यपाल कोश्यारी यांनी राज्य सरकारला सकारात्मक निर्देश देण्याची ग्वाही शिष्टमंडळाला दिली.