प्राथमिक शिक्षक पतपेढी अध्यक्ष विठ्ठल गवस यांचे स्पष्टिकरण
प्रतिनिधी / ओरोस:
सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढीमध्ये करण्यात आलेली शिपाई पदाची भरती ही सहकार कायदा, संस्थेचे पोटनियम, संस्था उपविधी व कर्मचारी नियमावली यांना अधिन राहून कायद्याच्या चौकटीतून करण्यात आली असल्याची माहिती पतपेढी अध्यक्ष विठ्ठल गवस यांनी दिली. भरती प्रक्रियेत कोणत्याही संवर्गावर अन्याय करण्यात आलेला नाही. संचालक मंडळ आपलेच आहे. त्यामुळे सभासदांनी शंका न घेता अधिक सभासदाभिमुख कामासाठी एकदिलाने सहकार्य करावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.
प्राथमिक शिक्षक पतपेढीची नुकतीच झालेली शिपाई पदाची भरती प्रक्रिया बिंदू नामावली डावलून केली जात असल्याचा आरोप काही सभासदांनी केला होता. यामध्ये विरोधी गटाच्या सभासदांबरोबरच सत्ताधारी गटाच्या काही सभासदांचाही सहभाग होता. दरम्यान भरती प्रक्रियेला विरोध असलेल्या सभासदांच्या आरोपांचा गवस यांनी इन्कार केला आहे.
रिक्त असलेल्या कणकवली, वैभववाडी आणि दोडामार्ग येथील प्रत्येकी एक अशा एकूण तीन शिपाई पदांसाठी ही प्रक्रिया झाली. यासाठी 58 अर्ज प्राप्त झाले होते. यातील पाच अर्ज बाद झाले होते. तर 53 उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. सहकार कायद्यानुसार या भरतीला कोणतीही बिंदूनामावली लागू नाही. त्यामुळे कोणत्याही संवर्गावर अन्याय करण्याचा कोणताही प्रश्न उद्भवत नाही. ही एक स्वायत्त पतसंस्था असून या संस्थेला कोणतेही शासकीय अनुदान मिळत नाही. संस्थेचे असलेले भांडवल हे स्वनिर्मित असून संस्था स्वयंपूर्ण आहे. अशा संस्थेचा कारभार कुशल, दर्जेदार व गुणवत्तापूर्ण कर्मचाऱयांमार्फत चालविणे, हे संस्था हिताच्या दृष्टीने फार महत्वाचे असते. शिक्षक हा एकच संवर्ग मानून गुणवत्तापूर्ण उमेदवाराची निवड करणे, बढती देणे, बदली करणे, त्यांना सेवेत कायम करणे हे अधिकार पूर्णतः संचालक मंडळाला देण्यात आले आहेत. त्यानुसार पूर्णतः पारदर्शक आणि मालक सभासदांना अभिमान वाटावा, अशा पद्धतीने ही भरती केली गेली असल्याचेही गवस यांनी स्पष्ट केले.
कर्मचारी नियमावलीनुसार निवड झालेला शिपाई पदाचा उमेदवार पदोन्नत्तीने क्लार्क, शाखाधिकारी, अधीक्षक आणि सचिव पदापर्यंत जाऊ शकतो. संचालक मंडळ हे पाच वर्षांनी बदलते. मात्र संस्थेला या स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी कुशल, गुणवत्तापूर्ण, होतकरू, कसोटीला उतरणारा उमेदवार निवडणे, हे कार्यरत असलेल्या संचालक मंडळाचे कर्तव्य आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. संचालक मंडळ सर्व संवर्गाचे असून या भरतीतील निवड झालेले तीन उमेदवार आणि प्रतीक्षा यादीतील सहा उमेदवार हे विविध संवर्गातील आहेत. त्यामुळे या भरती प्रक्रियेबद्दल कोणीही मनात शंका बाळगू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.