भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचे जनतेला आवाहन : विजापूरमध्ये भाजपच्या विजयसंकल्प अभियानाचा शुभारंभ
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्य काँग्रेसला पुन्हा घरी बसविण्याचा निर्णय कर्नाटकातील जनतेने घेतला आहे. भाजप म्हणजे विकास आणि काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचार. काँग्रेसमधील नेत्यांना केवळ खुर्चीची चिंता आहे. त्यामुळे त्या पक्षातील नेत्यांना आपापसात भांडू द्या, तुम्ही भाजपला जनतेची सेवा करण्याची संधी द्या, असे आवाहन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केले. विजापूर जिल्ह्यातील सिंदगी येथे पक्षाच्या विजयसंकल्प अभियानाचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते.
ते म्हणाले, राज्यात भाजप पुन्हा सत्तेवर येणार आहे. ‘सब का साथ, सब का विकास’, ‘सबका विश्वास, सब का प्रयास’ या अंतर्गत देशाला विकासाच्या दिशेने नेण्याचे भाजपचे उद्दिष्ट आहे. पंतप्रधान मोदींच्या प्रयत्नाने देशाने डिजिटल क्षेत्रात क्रांती केली आहे. भाजप सत्तेवर आल्यानंतर देशात ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत मोबाईल उत्पादनात वाढ झाली आहे. ऑटोमोबाईल इंडस्ट्रीत भारत जगात तिसऱ्या स्थानावर आहे, असे ते म्हणाले.
कोरोना संकटकाळात भारताने अनेक देशांना कोरोना प्रतिबंधक लस निर्यात केली होती. आज भारत मागणारा नव्हे; तर देणारा राष्ट्र बनला आहे. देशातील 100 कोटीहून अधिक जनतेला सरकारने लस दिली आहे. आज चीन कोरोना महामारीच्या विळख्यात सापडला आहे. तेथील सरकारने कोरोना मृत्यूची आकडेवारी लपवत आहे. अनेक देशांमध्ये कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. मात्र, भारतात कोरोना नियंत्रणात आहे. सरकारने यापूर्वी केलेल्या खबरदारी उपाययोजनांचा हा परिणाम आहे, असे जे. पी. नड्डा म्हणाले.
घरोघरी जाऊन प्रचार पत्रकांचे वाटप
आगामी निवडणुकीत भाजपला पुन्हा सत्तेवर आणण्याच्या इराद्याने पक्षातील वरिष्ठ नेते आतापासूनच राज्यात प्रचाराला लागले आहेत. केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजना आणि कामगिरीची माहिती घरोघरी पोहोचविण्यासाठी भाजपने शनिवारपासून राज्यभरात विजय संकल्प अभियान सुरू केले आहे. शनिवारी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. न•ा यांनी विजापूर जिल्ह्यातील नागठाण विधानसभा मतदारसंघात विजयसंकल्प यात्रेनिमित्त सदस्य नोंदणीचा शुभारंभ केला. तत्पूर्वी त्यांनी घरोघरी जाऊन प्रचारपत्रकांचे वाटप करून भाजपला पाठिंबा देण्याची विनंती केली.
चिक्कबळ्ळापूरमध्ये राज्य भाजप प्रभारी अरुणसिंग, दावणगेरेत केंद्रीयमंत्री प्रल्हाद जोशी, दासब पेठ येथे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई, बेंगळूरच्या जयनगर येथे भाजप प्रदेशाध्यक्ष नलीनकुमार कटील, महालक्ष्मी लेआऊट येथे भाजप राज्य सहप्रभारी डी. के. अरुणा यांनी विजयसंकल्प यात्रेला चालना दिली. केंद्र आणि राज्य सरकारच्या कामगिरीच्या प्रचारपत्रांची छपाई करून मतदारांच्या घरोघरी वाटप करण्यासाठी भाजपने हे अभियान सुरू केले आहे.