प्रतिनिधी/ कराड
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. विविध राजकीय पक्षांच्या हालचाली सुरू झाल्या असताना भाजपचे नेते डॉ. अतुल भोसले यांनी भाजपला विश्वासात घेतल्याशिवाय कोणत्याही पक्षाला आपले समीकरण करता येणार नसल्याचा दावा पत्रकारांशी बोलताना केला आहे.
येथे शेतकऱयांच्या विविध मागण्यांसाठी काढण्यात आलेल्या मूकमोर्चानंतर ते बोलत होते. कृष्णा कारखान्याचे उपाध्यक्ष जगदीश जगताप यावेळी उपस्थित होते.
डॉ. भोसले म्हणाले की, जिल्हा बँकेच्या निवडणुकीबाबत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व चंद्रकांतदादा पाटील यांच्याशी चर्चा करून तसेच भाजपच्या जिल्हय़ातील सर्व नेत्यांशी चर्चा करून भूमिका घेण्यात येणार आहे. जिल्हय़ात भाजपची ताकद वाढली असून सहकारातही वाढली आहे. त्यामुळे जिल्हय़ाची शिखर संस्था असणाऱया जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपला विश्वासात घेतल्याशिवाय कोणालाही आपले समीकरण करता येणार नाही. भाजपचा विचार केल्याशिवाय कोणालाच निवडणुकीबाबत निर्णय घेता येणार नाही.
या संस्थेचे राजकारण करत असताना पक्ष जो आदेश देईल, त्याप्रमाणे लवकरच आम्ही आमची भूमिका जाहीर करू, असेही ते म्हणाले.