राज्य कार्यकारिणी बैठकीत निर्णय ; युती नाहीच, मुदतपूर्व निवडणुकीची शक्यता फेटाळली : विश्वजित राणे, बाबूश मोन्सेरात दांडी
प्रतिनिधी /पणजी
कोणत्याही पक्षाशी युती न करता स्वबळावर निवडणूक लढविण्याचा निर्णय भाजप राज्य कार्यकारिणीच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. तशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी दिली. तरीही निवडणूक असल्यामुळे त्या वेळच्या परिस्थितीनुसार निर्णयात बदल होऊन युती होऊही शकते, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली. युतीसंदर्भात कोणतीही चर्चा झाली नाही असे स्पष्ट करताना मुदतपूर्व निवडणुकीची शक्यता त्यांनी फेटाळून लावली.
भाजप राज्य कार्यकारिणीच्या मंगळवारी झालेल्या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यावेळी महामंत्री ऍड. नरेंद्र सावईकर व दामू नाईक यांची उपस्थिती होती. कोविड मार्गदर्शक तत्वांमुळे बैठकीस मर्यादित सदस्यांची उपस्थिती होती. राज्यसभा खासदारासह बहुतेक मंत्री तसेच आमदार उपस्थित होते. मात्र मंत्री विश्वजित राणे आणि आमदार बाबूश मोन्सेरात हे राज्याबाहेर असल्यामुळे बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत, अशे तानावडे यांनी सांगितले.
कोरोना बळींना वाहिली श्रद्धांजली
बैठकीत प्रारंभी कोरोना महामारीमुळे मृत्यूमुखी पडलेल्यांप्रती संवेदना व्यक्त करून श्रद्धांजली वाहण्यात आली. गोवा प्रभारी तथा भाजप राष्ट्रीय सरचिटणीस सी. टी. रवी हे झारखंड येथे बैठकीत व्यस्त असल्यामुळे गोव्यात येऊ शकले नाहीत. त्यामुळे व्हर्च्युअल माध्यमातून या बैठकीस मार्गदर्शन केले.
सरकारच्या कामगिरीबद्दल अभिनंदन
नरेंद्र सावईकर यांनी राजकीय ठराव मांडला. त्यात कोरोनाच्या दुसऱया लाटेदरम्यान पक्ष म्हणून सरकारने जे काम केले तसेच भविष्यातील योजना तसेच अन्य कार्यक्रमांचे आयोजन तथा ’तौक्ते’ सारख्या संकटकाळात केलेले कार्य व सरकारच्या एकुणच कामगिरीबद्दल अभिनंदन करण्यात आले. या ठरावावर उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर, मंत्री मायकल लोबो, निलेश काब्राल, मॉविन गुदिन्हो खासदार विनय तेंडुलकर, आदींची भाषणे झाल्यानंतर ठरावास मंजुरी देण्यात आली.
केंद्राकडून अनेक सकारात्मक निर्णय
कोविडसंदर्भात केंद्र तसेच राज्य सरकार यांनी भरीव योगदान व कामगिरी केलेली असतानाही अनेकजण टीका करतात. महामारी आली तेव्हा आमच्याकडे त्यासंदर्भात कोणत्याही साधन-सुविधा, उपाययोजना नव्हत्या. औषधे, सुरक्षा उपकरणे, इस्पितळे, लस, ऑक्सिजन यापैकी काहीच नव्हते. तरीही केंद्र सरकारने अनेक सकारात्मक गोष्टी केल्या. सर्वप्रथम लसीची निर्मिती करून ती निर्यातही करण्याचा जागतिक बहुमान मिळविला, इस्पितळे उभारली. यासंदर्भात सावईकर यांनी माहिती दिली.
येत्या 2 ऑक्टोबर रोजी उत्तर गोवा कार्यकारिणीची बैठक होणार आहे तर दि. 3 रोजी दक्षिण गोवा कार्यकारिणी बैठक होणार आहे. या दोन्ही बैठकांना प्रभारी सी. टी. रवी उपस्थित राहणार आहेत, असे तानावडे यांनी सांगितले.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी समारोपाचे भाषण केले. त्याद्वारे येत्या निवडणुकीची तयारी सुरू करण्यात आली. राज्य कार्यकारिणीची बैठक प्रत्येक तीन महिन्यांनंतर घेण्यात येते, ही नियमित प्रक्रिया असल्याचे ते म्हणाले. यंदा उपस्थिती मर्यादित ठेवण्यासाठी मंडळ अध्य्नाक्षांना निमंत्रित करण्यात आले नव्हते. बैठकीस सुमारे 80 सदस्य उपस्थित होते, अशी माहिती तानावडे यांनी दिली.
युती संदर्भात कोणतीही चर्चा नाही
युती संदर्भात कोणतीही चर्चा झाली नाही. आम्ही स्वबळावर निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला आहे. तरीही ऐनवेळी या निर्णयात बदल होऊन युती होऊही शकते, असे त्यांनी स्पष्ट केले.
राज्य कार्यकारिणीत वैयक्तिक स्तरावर चर्चा होत नाही. त्यामुळे गोविंद गावडे यांच्या भाजप प्रवेशासंदर्भात कोणतीही चर्चा झाली नाही. तसेच मंत्री गावडे हे स्वतः बैठकीस उपस्थित नव्हते, असे तानावडे म्हणाले. कोणत्याही इच्छुकाने स्वतःची उमेदवारी जाहीर करू नये तसेच प्रसारमाध्यमांशी चर्चा करू नये, असे स्पष्ट बजावले असल्याचे ते म्हणाले.
एखाद्या पक्षाच्या उमेदवारीसाठी इच्छुकांची गर्दी होते हीच त्याच्या चांगल्या कार्याची पावती असते. अशावेळी बंडखोरी झाली तरीसुद्धा पक्ष ती चांगल्या प्रकारे हाताळेल, असे त्यांनी सांगितले.
काँग्रेसमधून आलेले काही आमदार भाजप उमेदवारी स्वीकारण्याच्या मानसिकतेत नसल्याचे ऐकिवात आहे, असे विचारता, सध्यातरी प्रदेश कार्यकारिणीस सर्व मंत्री व आमदार उपस्थित होते. त्यामुळे प्रत्येकावर विश्वास ठेऊनच त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. आता एखाद्याच्या मनात वेगळेच काहीतरी चालत असेल तर त्याचा उलगडा होणे शक्य नसते. ऐकिवात आलेल्या गोष्टीवर विश्वास ठेऊन कृतीही करता येत नाही, असे तानावडे म्हणाले.
विधानसभा अधिवेशनाचा कालावधी तीन दिवसांचा ठेवल्याबद्दल विचारले असता तो निर्णय सरकारचा आहे. त्यात पक्षाचा कोणताही सहभाग नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
तरुण भारतच्या ‘राजरंग’ सदराची चर्चा
भाजपच्या राज्य कार्यकारिणी बैठकीत दै. तरुण भारतचे संपादक सागर जावडेकर यांच्या ‘राजरंग’ या सदराबाबत चर्चा झाली. चार पाचजणांनी सांगितले की राजरंगमध्ये आलेले राजकीय विश्लेषण योग्य आहे. पक्षाने ते विश्लेषण लक्षात घ्यावे. अनेक मतदारसंघांतील राजकीय हालचाली तसेच वास्तव परिस्थिती त्यांत मांडण्यात आलेली आहे, असेही सांगितले,