उच्चस्तरीय चौकशीचा आदेश, भूसेनेचे स्पष्टीकरण
@ नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारताचे एक क्षेपणास्त्र तीन दिवसांपूर्वी चुकून पाकिस्तानात सोडण्यात आले होते, असे स्पष्टीकरण संरक्षण विभागाने दिले आहे. या घटनेच्या उच्च स्तरीय चौकशीचा आदेश देण्यात आला असल्याची माहितीही देण्यात आली.
भारताने सोडलेले एक क्षेपणास्त्र गुरुवारी रात्री पाकिस्तानच्या वायुक्षेत्रात शिरले आणि ते खानेवाल जिल्हय़ातील मिया चन्नू येथे आदळले असा आरोप पाकिस्तानने केला होता. पाकिस्तानने यासाठी भारताकडे तीव्र शब्दांमध्ये तक्रार नोंदविली होती. भारताने पाकिस्तानच्या वायूक्षेत्राचा भंग केल्याचा आरोपही पाकने केला होता. मात्र, या घटनेत कोणाचाही मृत्यू झाला नव्हता.
भारताचे स्पष्टीकरण
भारतीय क्षेपणास्त्र पाकिस्तानच्या क्षेत्रात पडल्याचा दावा सेनेने मान्य केला असला ही घटना हेतुपुरस्सर घडविण्यात आलेली नाही, असे स्पष्ट पेले आहे. चुकून काही गडबडीमुळे आणि तांत्रिक चुकीमुळे क्षेपणास्त्रची सरावाच्यावेळी दिशा चुकली. परिणामी, ते पाकिस्तानमध्ये गेले. मात्र त्यामुळे काहीही हानी झालेली नाही. या घटनेची कोर्ट ऑफ एन्क्वायरी कडून चौकशी करण्यात येईल. त्यानंतर हा प्रकार कसा घडला हे स्पष्ट होईल, असे भारताने स्पष्ट केले आहे.