भारतात पूर्ण लॉकडाऊनची आवश्यकता नाही
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
कोरोना नियंत्रणात ठेवण्यासाठी भारत सध्या करत असलेली उपाययोजना पुरेशी आहे. त्यामुळे पूर्ण लॉकडाऊनची आवश्यकता नाही. परिस्थिती पाहून आणि धोक्याचे प्रमाण लक्षात घेऊन केवळ स्थानिक पातळीवर निर्बंध घालावेत, अशी दिलासादायक सूचना जागतिक आरोग्य संघटनेने (हू) केली आहे.
या संघटनेचे भारतातील प्रतिनिधी रॉड्रिको एच. ऑफ्रिन यांनी भारतातील परिस्थितीविषयी वक्तव्य केले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार भारतात आता लॉकडाऊनची आवश्यकता उरलेली नाही. प्रवासावर पूर्ण बंदी किंवा लॉकडाऊन यासारख्या कठोर उपाययोजना अर्थव्यवस्थेसाठी घातक ठरु शकतात. लोकांचा जीव आणि अर्थव्यवस्था हे दोन्ही वाचविणे आवश्यक आहे. त्यानुसार धोरणात्मक निर्णय घेण्यात यावेत. ज्या लोकवस्त्यांमध्ये कोरोनाचा धोका अधिक आहे त्या वस्त्यांपुरते निर्बंध घालणे योग्य ठरेल, अशा अनेक सूचना त्यांनी केल्या.
पूर्ण लॉकडाऊनमुळे हानी
जागतिक आरोग्य संघटना सध्याच्या परिस्थितीत कोणत्याही देशाला पूर्ण लॉकडाऊनचा सल्ला देत नाही. हा उपाय अधिक हानीकारक आहे. भारतासारख्या देशात, जेथे विविध प्रकारचे लोक मोठय़ा संख्येने राहतात, अशा देशात पूर्ण लॉकडाऊनचा लाभ होत नाही. त्याऐवजी धोरणात्मक निर्बंध घालणे योग्य ठरणार आहे. देशाची आर्थिक स्थिती, खर्च करण्याचा आवाका आणि सामाजिक स्थिती लक्षात घेऊन उपाय योजना करावी लागणार आहे. सर्व नागरीकांनी कोरोना विषयीचे नियम कसोशीने पाळले तर लॉकडाऊनची आवश्यकताच राहणार नाही. मास्क आणि लसीकरण हेच सध्या सर्वोत्तम उपाय आहेत. त्यांचे पालन प्रत्येकाने करावे, असेही महत्वपूर्ण आणि मार्गदर्शक व्यक्तव्य त्यांनी केले.
सर्व नियमांचे पालन आवश्यक
मास्कचा सातत्याने उपयोग, सर्वांचे लसीकरण करण्यावर भर, हातांची स्वच्छता नेहमी राखणे आणि सामाजिक अंतर शक्य तितके राखणे असे उपाय सर्वांनी केल्यास कोरोनाचा प्रसार रोखणे शक्य होणार आहे. हे उपाय प्रभावी असून सहजसाध्य आहेत. त्यांसाठी विषेश खर्चही येत नाही. परिणामी, याच उपयांवर भर देऊन त्यांसंबंधी प्रबोधन करणे आवश्यक आहे. या सर्व उपायांचे व्यवस्थित पालन झाले तर कोरोना पुरेशा प्रमाणात आटोक्यात येईल, अशा सूचना त्यांनी केल्या.