आपला खंडप्राय देश लहरी हवामानाच्या संकटाला सामोरा जात असून कुठे शीतलहरीच्या प्रकोपामुळे आणि अवकाळी पर्जन्यवृष्टीमुळे इथल्या सर्वसामान्य जनतेला फटका बसलेला आहे. एकेकाळी जून ते सप्टेंबर या चार महिन्याच्या काळात भारतातल्या बऱयाच भागांत नैऋत्य मान्सूनद्वारे पर्जन्यवृष्टी होत असते परंतु गेल्या काही वर्षांपासून मान्सूनच्या लहरी पावसाळय़ाचे आगमन हिवाळय़ापर्यंतच नव्हे तर उन्हाळा ऐन उंबरठय़ावरती येऊन पोहोचलेला असतानाही रेंगाळलेले आहे. त्याचे दुष्परिणाम जनजीवन, पर्यटन व्यवसाय आणि कृषी, बागायती पिकांवरही प्रकर्षाने जाणवू लागलेले आहेत. बदलत्या हवमानाच्या संकटामुळे इथली अर्थव्यवस्था ही गांभीर्याने प्राभावित झालेली आहे. ऑक्टोबर ते जानेवारी हा चार महिन्यांचा काळ हिवाळय़ाचा असताना, यंदा पावसाळय़ाने निरोप घ्यायला विलंब लावल्याने, हिवाळय़ात शीतलहरीचा प्रकोप उत्तर प्रदेश, दिल्ली, पंजाब, हरयाणा आदी राज्यांना प्रकर्षाने जाणवणार असल्याचा अंदाज व्यक्त केलेला आहे.
काश्मिरात शीतलहरीचा प्रकोप गुलमर्ग आणि पहलगामसारख्या पर्यटन स्थळांवरती झालेला आहे. येथील न्यूनतम तापमान शुन्यापेक्षा कमी झालेले आहे. जम्मू काश्मिरची ग्रीष्मकालीन राजधानी श्रीनगरात तापमान 2.8 डिग्री सेल्सियस नोंद झालेले आहे. हवामान शास्त्रानुसार सध्या शीतलहरीचा प्रकोप इथे जाणवत आहे. त्याला हिमालय पर्वतरांगात असलेल्या पश्चिमी विक्षोम कारणीभूत असल्याचे सांगण्यात येत आहे. हिवाळय़ात शीतलहर असणे हे खरेतर निसर्गाच्या मौसमीचक्राचा परिणाम मानले जायचे परंतु 2012पासून शीतलहरीने मूत्यूमुखी पडणाऱयांची आणि पिकांबरोबर जनजीवन विस्कळीत होण्याच्या प्रमाणात वृद्धी होत असल्याने आज त्याकडे एक आपत्ती म्हणून पाहिले जात आहे. वर्तमान आणि आगामी काळात शीतलहरीच्या या प्रकोपाकडे दुर्लक्ष करून, योग्य उपाययोजना केली नाही तर त्याचे दुष्परिणाम आणखी गंभीरपणे उद्भवण्याची चिन्हे स्पष्ट होऊ लागली आहेत. पाकिस्तानात राजधानी इस्लामाबादापासून 64 किलोमीटर अंतरावर असलेल्या मुर्री या थंड हवेच्या ठिकाणी प्रचंड बर्फ वृष्टी झाल्याने तेथील स्थानिक आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेमार्फत दिरंगाई झाल्याने उद्भवलेल्या दुर्घटनेत 23 पर्यटकांचा करुणरित्या मृत्यू उद्भवलेली बाब प्रकाशात आलेली आहे.
शीतलहरीच्या प्रकोपाचे संकट टांगते असताना मोठय़ा संख्येने पर्यटकांनी डोंगर पायथ्याशी असलेल्या मुर्रीत गर्दीत केली होती. वादळी बर्फवृष्टीमुळे पर्यटकांची शेकडो वाहने महामार्गावरती अडकून पडली होती. त्यातल्या काहीजणांचा मृत्यू काचाबंद असलेल्या वाहनात गुदमरून झालेला आहे. यंदा हवामान खात्यातर्फे यावर्षीचा प्रारंभ शीतलहरीने होणार असल्याची पूर्वसूचना दिली होती. गेल्यावर्षी जवळपास 99 दिवस भारताला शीतलहरीचा प्रकोप सोसण्याची वेळ आली होती. 2016च्या हिवाळय़ापासून भारतीय हवामानशास्त्र खात्यामार्फत शीतलहरीची पूर्वसूचना देण्यात येत असते. हवामानातल्या नाना परिस्थितींमुळे प्रशांत महासागर थंड होण्याच्या प्रक्रियेबरोबर पश्चिमी विक्षोमामुळे बऱयाच ठिकाणी पर्जन्य आणि बर्फ वृष्टी होऊन तापमान खालावण्यात आलेले आहे.
जेव्हा एखाद्या ठिकाणी कमीतकमी तापमान चार डिग्री सेल्सियसपेक्षा कमी किंवा समान होते तेव्हा शीतलहरीचा प्रकोप जाहीर केला जातो. शीतलहरीवेळी बऱयाचदा निर्माण झालेले थंड हवामान शरीराला सहन करण्यासारखे असले तरी त्याचे बालक, गरोदर स्त्रिया, वयोवृद्ध आणि इतर गंभीरस्वरुपाच्या आजारांनी ग्रस्त असलेल्यांवर आरोग्याच्या समस्यांच्या गुंतागुंतीला सामोरे जाण्याची वेळ येत असते. 2018मध्ये शीतलहरीत जानेवारीत उत्तर भारतात 100 जणांचे मृत्यू उद्भवले तर डिसेंबर-जानेवारीत आतापर्यंत सुमारे 2000 जणांना मृत्यू आल्याचे स्पष्ट झालेले आहे. 2010 मध्ये 600 तर 2011 मध्ये 650 लोकांना शीतलहरीच्या प्रादुर्भावामुळे दुर्बल शारीरिक अवस्थेवेळी मृत्यू आल्याचे उघडकीस आलेले आहे. खरंतर 2017 ते 2020 साली उष्माघातामुळे दोन तर शीतलहरीच्या प्रकोपामुळे 152 मृत्यू उद्भवण्याची नोंद झालेली आहे.
2018 साली देशभरातल्या 136 जणांचा शीतलहरीने तर केवळ सोळा जणांचा मृत्यू उष्माघातात झाल्याचे प्रकाशात आलेले आहे. 2018 पर्यंत डिसेंबर-जानेवारी या काळात गेल्या काही वर्षांत 2000 मृत्यू शीतलहरीमुळे उद्भवल्याचे स्पष्ट झाल्याने या नैसर्गिक आपत्तीला सामोरे जाण्यासाठी आम्ही जर नियोजनबद्ध आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी करण्याच्यादृष्टीने दिरंगाई केली तर वर्तमान आणि आगामी काळात मृत्यू उद्भवण्याच्या प्रमाणात विलक्षण वाढ होणार आहे.
सध्या गोवा-कोकणात अवकाळी पावसानंतर पडलेल्या थंडीमुळे आंबा-काजुला मोहर आला होता परंतु पुन्हा पाऊस, गारवा आणि ढगाळ हवामानामुळे मोहर करपण्याची धास्ती बागायतदारांनी घेतलेली आहे. वाऱयाच्या गतीत किनारपट्टी भागात वाढ होणार असल्याने त्याचे दुष्परिणाम मच्छिमारीवरही होणार आहेत. गोव्यात सर्वसाधारण तापमानापेक्षा 3.3 डिग्री सेल्सियस कमी म्हणजे 29 डिग्री सेल्सियसची नोंद झालेली आहे तर पणजी, मुरगावसारख्या शहरात 19 डिग्री सेल्सियसपेक्षा कमी नोंद झालेली आहे. 20 फेब्रुवारी 1965 रोजी 13.3 तर 12 डिसेंबर 1981 रोजी 15.7 डिग्री सेल्सियस तापमानाची यापूर्वी नोंद झालेली आहे.
1980 ते 2018 या कालखंडापासून शीतलहरीचे प्रस्थ देशभरात निर्माण होत असून 2018 पर्यंत गेल्या 39 वर्षांत 8169 लोकांचा शीतलहरीत मृत्यू झाल्याने दरवर्षीची सरासरी 200 मृत्यू झालेली असल्याने या प्रकरणी चिंता वाढलेली आहे. आहारात ‘क’ जीवनसत्व समृद्ध फळ आणि भाज्याचा वापर, गरम पाणी योग्य प्रमाणात पिणे, ऊबदार कपडय़ांचा वापर, असंघटीत कामगार आणि बेघरांना निवाऱयाची सोय, शीतलहर संबंधीत आजार आणि गुंतागुंतीचे निराकरणास वैद्यकीय उपचार आणि औषधांची उपलब्धता, शीतलहरी संबंधीत आजारासाठी प्रथमोपचार सुविधा, आरोग्यदायी अन्नाबरोबर शरीराला पौष्टिकता आणि आवश्यक ऊर्जा पुरविणाऱया अन्न घटकांच्या समावेशाला आहारात प्राधान्य देण्याची गरज आहे. एकेकाळी आपल्या देशात मौसमानुसार सण-उत्सवांचे प्रयोजन करून त्यात विशिष्ट आहाराला महत्त्व दिले होते.
कुळीथाची पिठी, तिळगुळाचे लाडू, भाजलेल्या भुईमुगाच्या शेंगांचा समावेश आहारात करण्याची परंपरा इथल्या लोकमानसात रुढ होती. निसर्गातल्या आपत्तींना सामोरे जाण्याची जाणीव आणि पूर्वतयारी आमचे जीवन सुरक्षित आणि समृद्ध करण्यात मदत करणार आहे.
– राजेंद्र केरकर